गद्दारांना उत्तर देण्याची गरज नाही : उद्धव ठाकरे

पुणे- शिवसेना (यूबीटी) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज आपल्या पुणे दौऱ्यात शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांच्या दसरा मेळाव्यातील टीकेला थेट प्रत्युत्तर देणे टाळले. “मी गद्दार, नमकहराम आणि हरामखोरांना उत्तर देत नाही,” अशा कडवट शब्दांत त्यांनी कदम यांना चांगलेच झोडपले. ठाकरे म्हणजे काय? हे संपूर्ण महाराष्ट्र आणि देश ओळखतो, असे सांगून त्यांनी कदमांच्या आरोपांना धुडकावले. दुसरीकडे, दसरा मेळावा, केंद्रातील मोदी सरकारची धोरणे, हिंदुत्व आणि मनसेसोबत संभाव्य युती अशा विविध मुद्द्यांवर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
पुण्यातील पत्रकार परिषदेत बोलताना ठाकरे यांनी गेल्या आठवड्यातील शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्याचे वर्णन अभूतपूर्व केले. “पावसामुळे मैदान चिखलयुक्त झाले होते, पण मुंबईसह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिक आले. त्यांनी स्वतःची चटणी-भाकरी आणली होती. पावसातही कुणी जागचा हलला नाही,” असे ते म्हणाले.
शिवसेनेच्या ऐतिहासिक प्रवासाचा उल्लेख करताना ठाकरे यांनी १९६६ च्या पहिल्या दसरा मेळाव्याकडे लक्ष वेधले. “मी तेव्हा सहा वर्षांचा होतो. बाळासाहेबांनी शिवाजी पार्कवरच सभा घेण्यावर ठाम राहिले. ‘मी वेडा की लोक वेडे, हे पाहून घेऊ,’ असे ते म्हणाले होते. आज हे दोघेही वेडे नव्हते, हे सिद्ध झाले,” असे ते हसत सांगितले.
मोदी सरकारवर थेट हल्ला : देशाला खऱ्या नेत्यांची गरज –
केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर ठाकरे यांनी कठोर शब्दात टीका केली. “देशाला आता खऱ्या पंतप्रधानांची, गृहमंत्र्यांची आणि मंत्रिमंडळाची गरज आहे. सधा जे बसले आहेत, ते एका पक्षाचे मंत्री आहेत, देशाचे नाहीत,” असे ते म्हणाले. लडाखमधील सोनम वांगचुक यांच्यावर रासुका लावण्याच्या प्रकरणाचा उल्लेख करताना त्यांनी विचारले, “त्यांनी कोणता राष्ट्रद्रोह केला? कालपरवा ते मोदींची स्तुती करत होते, तेव्हा ते देशभक्त होते. पण मणिपूरमध्ये, लडाखमध्ये काय चालले आहे? आसाममध्ये आदिवासी रस्त्यावर उतरले आहेत, पण त्याची बातमीही येत नाही.” अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे हे आपले कर्तव्य असल्याचे सांगून त्यांनी आजोबा आणि वडिलांकडून शिकलेले ब्रिदवाक्य ‘अन्याय दिसेल तिथे लाथ मार’ याचा उल्लेख केला.
हिंदुत्वावरून भाजपला प्रश्नांचा भडिमार –
हिंदुत्वाच्या मुद्द्यावर बोलताना ठाकरे यांनी भाजपवर शरसंधान साधले. “भाजपसोबत असताना आम्ही हिंदुत्ववादी होतो. आता त्यांना सोडले म्हणजे हिंदुत्व सोडले का? सरसंघचालक मोहन भागवत मशीदीत जातात, भाजप अल्पसंख्यकांना सदस्यत्व देते आणि ‘सौगात ए मोदी’ देतात. पण आम्ही काँग्रेससोबत गेलो तर हिंदुत्व सोडले? ‘सौगात ए नेहरू’ किंवा ‘सौगात ए इंदिरा’ कधी पाहिले? मग ‘सौगात ए मोदी’ देणारे हिंदुत्ववादी कसे?” असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. “तुमच्या राज्यात हिंदू असुरक्षित आहेत, तरी पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळता कसे? ज्यांनी हिंदूंना मारले, त्यांच्याशी मैत्री कशी?” असा त्यांनी खणखणीत हल्ला चढवला. “भाजप जे करते ते ‘अमर प्रेम’, दुसरे जे करतात ते ‘लव्ह जिहाद’, असे कसे?” असेही ते म्हणाले.
मनसे युतीवर स्पष्ट भूमिका : मराठी माणसाची एकजूट भीती निर्माण करते –
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राज ठाकरे यांच्याशी संभाव्य युतीबाबत बोलताना ठाकरे यांनी सांगितले, “२००५ मध्ये आम्ही वेगळे झालो. आता एका मुद्द्यावर एकत्र आलो आहोत. रोज ‘आम्ही एकत्र आलो’ असे सांगण्याची गरज नाही. ५ जुलैचा मेळावा झालाच नसता, तर एकत्र येणे शक्य नव्हते. यामुळे विरोधकांचे धाबे दणाणले आहेत. मराठी माणूस एकवटला तर काय होईल, याची त्यांना भीती वाटतेय.”
रामदास कदम यांच्या आरोपांबाबत पत्रकारांनी त्रास होतो का, असा प्रश्न विचारला असता ठाकरे यांनी सांगितले, “हो, वेदना होतात. पण शिवाजी पार्कमधील हजारो लोकांच्या आशीर्वादाने त्यावर रामबाण उपाय होतात. शिव्या देणाऱ्यांपेक्षा आशीर्वाद देणाऱ्यांची संख्या जास्त आहे, म्हणून मी उभा राहू शकलो.”
रामदास कदम यांनी काय आरोप केले?
बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झाल्यानंतर दोन दिवस त्यांचा मृतदेह तसाच ठेवला होता. तसेच बाळासाहेब ठाकरे यांच्या हाताचेही ठसे घेण्यात आले होते. हे ठसे नेमके कशासाठी घेण्यात आले होते? असा शिवसेना शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी आरोप केला आहे. शिवसेना शिंदे गटाचा दसरा मेळावा झाला. त्यावेळी रामदास कदम यांनी बाळासाहेबांच्या मृतदेहाबाबत खळबळजनक दावा केला.





