मुंबई – विधिमंडळाच्या 2 दिवसीय हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. दोन दिवसांच्या अधिवेशनावरुन विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. लोकांचे प्रश्न मांडता येऊ नये, शेतकऱ्यांना न्याय मिळू नये, मराठा, ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर प्रश्नच उपस्थित होऊ नये, यासाठी सरकार चर्चेपासून पळ काढत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
करोना काळात सरकारी बंगल्यांच्या नूतनीकरणावर कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले. या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, बंगल्यांच्या नूतनीकरणाची कामे सुरु असतात. बंगल्यांच्या नूतनीकरणावरील खर्च कमीत कमी पैशात झाला पाहिजे. पण शेतकऱ्यांना सुद्धा मदत करा. या सरकारकडे बंगल्यांवर खर्च करायला पैसा आहे, मग शेतकऱ्यांना द्यायला पैसा का नाही? असा प्रश्नदेखील त्यांनी सरकरला विचारला आहे.
दरम्यान, महाराष्ट्रातील सध्याचे वातावरण हे अघोषित आणीबाणी लागू असल्यासारखे आहे. सरकारच्या विरोधात बोलल्यास त्यांना थेट तुरुंगात डांबले जात आहे. अर्णब गोस्वामी आणि कंगना यांच्या प्रकरणात खरंतर ठाकरे सरकारला चपराक बसली आहे. तरीही महाराष्ट्रात कुणीही काहीही सरकारच्या विरोधात बोलले की त्याला कुठल्या तरी केसमध्ये अडकवायचे असे प्रकार सुरु आहेत, असा हल्लाबोल देवेंद्र फडणवीस यांनी केला होता.
हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषद घेत देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर टीकेचे बाण सोडले. तसेच अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला होणाऱ्या चहापानावर बहिष्कार टाकला होता.