नागपूर – शेतकऱ्यांचे विषय गंभीर आहे. अवकाळी पावसाचा विषय आहे, यासाठी घोषणा तुडूंब होताहेत, पण प्रत्यक्षात काहीच देत नाहीत. अधिवेशन ( Hiwali adhiweshan ) असले की, घोषणा करा असे नसते, एवढेच नव्हे तर अधिवेशनच्या आधीसुद्धा याच सरकारने अनेक घोषणा केल्या. पण घोषणांचा पाऊस, घोषणांचा सुकाळ आणि अंमलबजावणीचा दुष्काळ असं चित्र आहे. मी मागे म्हटलं होतं की, दुष्काळात तेरावा महिना कशाला म्हणायचा? तर या सरकारला म्हणा, अशा शब्दांत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( uddhav thackeray ) यांनी सरकारवर निशाणा साधला. ( Shinde fadanvis sarkar )
राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या आठवड्यास सोमवारपासून सुरुवात झाली. मागील दोन आठवड्यापैकी दुसऱ्या आठवड्यात मराठा आरक्षणावर चर्चा झाली. हाच मुद्दा हेरून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. मराठा समाजाला आरक्षण देत असाल आणि तेही कुणाच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण देत असाल तर आम्ही सरकारला पाठींबा देऊ असे मोठं विधान त्यांनी केले.
उद्धव ठाकरे म्हणाले की, राज्यात आरक्षणाचा मुद्दा गाजत आहे. आम्ही याआधीच मराठा समाजाला पाठिंबा दिलेला आहे. सभागृहात चर्चा करण्यापेक्षा शपथ कुणी घेतली शिवाजी महाराजांच्या चरणाची ? त्यांनी सांगायला पाहिजे की, कोणत्याही समाजाचं एक सुद्धा आरक्षण कमी न करता मराठा समाजाला आरक्षण कसं देणार आहात ? चर्चा कसली करताय ? आम्ही पाठिंबा दिलेला आहे.
आम्ही कोर्टात सुद्धा लढलेलो आहोत. पण कोणत्याही इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता तुम्ही मार्ग काढत असाल तर ते आम्हाला सांगा.आम्ही तुम्हाला पाठिंबा देतो, आज जाहीरपणे सांगतोय की, कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता हे सरकार मराठा समाजाला आरक्षण ज्याक्षणी देईल त्या क्षणाच्या आधीच मी त्यांना पाठिंबा देतोय असं मोठं विधान उद्धव ठाकरे यांनी यावेळी केले. त्यांच्या या वक्तव्याचा आता महायुतीतील शिंदे गट कसा अर्थ काढतो हे पहावे लागणार आहे.