रामदास आठवले यांचा राहुल गांधी यांना टोला
नवी दिल्ली : रोजगार मिळाले नाही तर देशातील तरुण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दंड्याने मारतील, असे वक्तव्य कॉंग्रेस नेते राहुल गांधी केले होते. राहुल गांधींच्या वक्तव्यावरून भाजपसह इतरांकडून टीकेची झोड उठली आहे. आता यात रिपाईचे नेते आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी उडी घेतली आहे. राहुल गांधी जर पंतप्रधानांना दंडा मारतील तर आम्ही त्यांनी अंडा मारू, असे रामदास आठवले यांनी म्हटले आहे.
रामदास आठवले म्हणाले, कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी जर पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात “दंडा मार’ची भाषा केली तर आम्ही त्यांच्याविरोधात अंडी मारो आंदोलन करु. राहुल गांधी अशा प्रकारची वक्तव्य करत असल्यानेच अमेठीतून ते निवडणूक हरले. राहुल गांधी हे स्वतःच कॉंग्रेस पक्ष कमकुवत करत आहेत. ते अशाच प्रकारे बोलत राहिले तर कॉंग्रेस पक्ष संपेल, अशीही टीका आठवलेंनी केली.
दरम्यान, संसदेत सुधारित नागरिकत्व कायदा मंजूर झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आसाममधील कोक्राझारचा दौरा केला. या सभेत त्यांनी राहुल गांधींचे नाव न घेता त्यांच्यावर हल्लाबोल केला होता.