सिंधुदुर्ग : कणकवली नगरपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने कोकणात रोज नवनवीन राजकीय घडामोडी घडत आहेत. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत ‘शहर विकास आघाडी’च्या नावाने युती होण्याची जोरदार चर्चा सुरू आहे. या युतीमुळे राणे कुटुंबियांच्या भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, याची चाहूल लागताच भाजपचे खासदार नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन शिंदे गटाला कडक इशारा दिला आहे. काल (शुक्रवारी) दिवसभर युतीच्या चर्चा रंगल्या. कणकवलीत गुप्त बैठकही झाली, ज्यात ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईक, शिंदे गटाचे माजी आमदार राजन तेली, सुशांत नाईक, संदेश पारकर आणि सतीश सावंत यांच्यासह प्रमुख पदाधिकारी सहभागी झाले. या बैठकीत ‘शहर विकास आघाडी’ नावाने एकत्र लढण्याचा मनोदय व्यक्त झाला. ठाकरे गटाचे संदेश पारकर यांना नगराध्यक्ष पदासाठी पाठिंबा देण्याची शक्यता आहे. दरम्यान, युती होण्याची माहिती मिळताच नारायण राणे संतापले. ते म्हणाले, “ठाकरे गटासोबत युती झाली तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेशी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात आम्ही पूर्णपणे संबंध तोडून टाकू. विशाल परब आणि राजन तेली यांना मी मानत नाही, नेहमी विरोध करीन. प्रतिष्ठित नागरिकांमध्ये राजन तेली बसत नाहीत. सर्वांनी टाकून दिलेले एकनाथ शिंदे का जमा करतायत?” असा घणाघाती हल्ला राणेंनी राजन तेली यांच्या शिंदे गट प्रवेशावरून चढवला. उद्धव ठाकरेंनी स्थानिक निवडणुकांत शिंदेंसोबत युती नको असे आदेश दिले असले तरी कोकणात वेगळं चित्र दिसतंय. महायुतीत मात्र राणेंच्या वक्तव्याने तणाव वाढला आहे. शिंदे गटाच्या राजन तेली यांनी युतीबाबत स्पष्टोक्ती दिली नसली तरी भाजपविरोधात आघाडी उभी राहण्याचे संकेत आहेत.