पुणे – आजपर्यंत जेवढी कर्जमाफी झाली त्यातील महाविकास आघाडीने केलेली कर्जमाफी सर्वात मोठी आहे. केवळ एक महिन्याच्या आत सरकारने हा निर्णय घेतला. जर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एकर आणि हेक्टरमधील फरक कळला नसता तर, राज्यातील लाखो शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा निर्णय त्यांनी घेतला नसता, असा टोला नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना लगावला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एकर आणि हेक्टरमधील फरक समजतो का, असा प्रश्न पाटील यांनी विचारला होता. त्याला शिंदे यांनी वरील उत्तर दिले. सरकार आपली कामगिरी दमदारपणे बजावत आहे. राज्यातील एकही व्यक्ती उपाशी राहू नये म्हणून दहा रुपयांत भोजनथाळी देण्याचा निर्णयही या सरकारने घेतला आहे. इतक्या कमी वेळेत सरकारने हे मोठे निर्णय घेतले आहेत. त्याचा फायदा लाखो लोकांना होणार आहे. हे निर्णय पाटलांच्या पचनी पडत नाहीत; त्यामुळे ते आरोप करत आहेत.
मातोश्रीवर आलेल्या शेतकऱ्याकडे बॅंकेने तगादा लावला होता, अशी त्या शेतकऱ्याची तक्रार आहे. संबंधित शेतकऱ्याची बाजू ऐकून घेतल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बॅंकांना स्पष्ट निर्देश दिले आहेत. बॅंकेने शेतकरी खातेदाराला त्रास दिल्यास, सरकार गंभीर निर्णय घेईल असा इशारा एकनाथ शिंदे यांनी दिला. ठाकरेंच्या नेतृत्वाखालील सरकारने एक महिन्याच्या आत शेतकऱ्यांसाठी दोन लाख रुपयांच्या कर्जमाफीचा निर्णय घेतला. संबंधित बॅंका, अधिकारी यांना कर्जमाफीचा लाभ शेवटच्या शेतकऱ्यांना झाला पाहिजे, अशा स्पष्ट सूचना दिल्या.
भाजपला पोटदुखी
सरकार टिकू नये यासाठी कुणी कितीही देव पाण्यात बुडवून बसले तरी महाविकास आघाडीचे सरकार राज्याच्या हिताचे निर्णय घेत राहील. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांची विचारधारा जरी वेगवेगळी असली तरी राज्यातील जनतेच्या हिताचा विचार करूनच कॉमन मिनिमम प्रोग्रॅम तयार केला आहे. महाविकास आघाडी सरकारने अल्पावधीत घेतलेल्या मोठ्या निर्णयांमुळेच भाजपच्या पोटात दुखत आहे. म्हणूनच ते वावड्या उठवत असून, अफवांना हवा घालत आहे, असाही टोला शिंदे यांनी भाजपचे नाव न घेता लगावला. सत्तार यांच्या राजीनाम्याचीही केवळ हवाच केल्याचेही शिंदे यांनी सांगितले.