सातारा -सातारा शहरात करोनाची साखळी तोडण्यासाठी पालिका प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. अनेक ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणाऱ्या दुकानदारांवर कारवाईचा बडगा उगारला आहे; परंतु त्याचाही फारसा परिणाम होताना दिसत नाही. त्यामुळे नियमांचे पालन न करणाऱ्यांची दुकाने महिनाभरासाठी सील करण्यात यावीत, असा आदेश प्रांताधिकारी मिनाज मुल्ला यांनी दिला आहे.
सातारा शहरात करोना प्रतिबंधासाठी आणखी कोणत्या उपाययोजना कराव्यात, यासंबंधी प्रांताधिकारी कार्यालयात सोमवारी बैठक झाली. त्यात ते बोलत होते. पालिकेच्या मुख्याधिकारी रंजना गगे, कोव्हिड कक्षाचे प्रणव पवार, अतुल दिसले व अधिकारी उपस्थित होते. सातारा तालुक्यात गेले काही दिवस करोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे.
ही साखळी तोडण्यासाठी प्रशासन झटत असताना आता शहरातही रुग्णांची भर पडत आहे. शहरातील करोनाचे संक्रमण रोखण्यासाठी पालिका प्रशासनाने उपाययोजनांची तीव्रता वाढविणे गरजेचे आहे. पालिका करत असलेल्या उपाययोजनांना दुकानदार व नागरिकांकडून अपेक्षित सहकार्य मिळत नाही. शासनाच्या नियमांचे व निर्देशांचे पालन केले जात नाही.
त्यामुळे पालिका प्रशासन व पोलीस दुकानदारांवर दंडात्मक कारवाया करत आहेत. सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणाऱ्या व निर्धारीत वेळेपेक्षा जास्त वेळ दुकाने सुरू ठेवणाऱ्या दुकानदारांना दंड ठोठावला तरी त्याचा अपेक्षित परिणाम होताना दिसत नाही. दुकानदार नियमांची वारंवार पायमल्ली करत आहेत. यापुढे संबंधित दुकानदारांना दोन वेळा समज देऊन दंडात्मक कारवाई करावी.
तिसऱ्यांदा नियमांचे उल्लंघन केल्यास ती दुकाने महिनाभरासाठी सील करावीत, असा आदेश मुल्ला यांनी दिला. पालिकेकडून राबविल्या जात असलेल्या उपाययोजना, नव्याने सुरू करण्यात आलेले सर्वेक्षण, सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्रांमधील उपाययोजनांची माहिती गगे यांनी प्रांताधिकाऱ्यांना दिली.