रेठरे बुद्रुक – कराड शहरानजीक असणाऱ्या मलकापूर-आगाशिवनगर परिसरात करोनाचे रूग्ण सापडले आहेत. तसेच तालुक्यातील काही गावांमध्येही करोना रूग्ण सापडले आहेत. या करोना महामारीचा आपल्या गावात प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी अतिदक्षता म्हणून दि. 23 एप्रिलपासून रेठरे बुद्रुक गाव सर्व प्रकारच्या वहातुकीसाठी व बाहेरील व्यक्तींसाठी पोलिसांच्या मदतीने ग्रामस्थानीं स्वत:हून पूर्णपणे सील केले आहे.
रेठरे बुद्रुक ता. कराड येथील बहुतांशी नागरिक नोकरी व्यवसायानिमित्त बाहेरगावी आहेत. करोना महामारी सुरू झाल्यापासून यापैकी बरेचसे लोक गावात वास्तव्यास आले आहेत. त्यांना ग्रामसमिती पोलीस विभाग व प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या मदतीने तपासणी करून, जे लोक करोना प्रादुर्भाव झालेल्या भागातून आलेले आहेत. त्यांना क्वारंटाईन करण्यात आलेले आहे.
तसेच ग्रामपंचायतीच्या वतीने विविध उपाययोजना सुरू आहेत. जवळपास वीस हजाराच्या आसपास लोकसंख्या असणारे हे गाव. सातारा आणि सांगली जिल्ह्याच्या सीमा रेषेवरती वसलेले आहे.सध्या दोन्ही जिल्ह्यात करोनाचे रुग्ण सापडलेले आहेत. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
नुकतेच कराड परिसरात करोनाची रुग्णसंख्या वाढू लागली आहे. मलकापूर, आगाशिवनागर येथे करोनाचा प्रसार झाला आहे. रेठरे बुद्रुक गावातील बरेच लोक नोकरी व्यवसायानिमित्त या परिसरात वास्तव्यास आहेत. त्यामुळे रेठरेकरांची चिंता वाढली आहे.
गावातील शेकडो लोक कृष्णा हॉस्पिटल येथे नोकरीनिमित्त ये-जा करत असतात. तसेच बाहेरगावचे विविध व्यापारी भाजीपाला, फळे, तसेच इतर साहित्य विक्रीनिमित्त गावात येत असतात. त्यांच्यामुळे गावात करोनाचा प्रसार होण्याची भीती ग्रामस्थांमधून व्यक्त होऊ लागली आहे. त्यामुळे, ग्रामस्थ व ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी पोलिसांच्या मदतीने गावातील वर्दळ, प्रवाशी वाहने व बाहेरील व्यक्तींना पूर्व परवानगीशिवाय गावात प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे.
त्यादृष्टीने दि. 23 पासून गावात येणारे सर्व रस्ते बॅरिगेटस् तसेच लोखंड व बांबूच्या सहाय्याने बंद केले आहेत. रेठरे पुलावरून थेट कृष्णा कारखान्याकडे जाणारा मुख्य रस्ता फक्त रिकामा ठेवण्यात आला आहे. गावात पै-पाहुणे नातलग यांना ये – जा करण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच गावातील मुख्य चौकात भाजीपाला विक्रीसाठी बसणाऱ्या विक्रेत्यांनाही समज देऊन गर्दी न करता नियमानुसारच मुख्य रस्ता सोडून इतर ठिकाणी भाजी विक्री करण्याचे आदेश ग्रामपंचायतीने दिले आहेत.
एकंदरीत करोना रोग गावापासून अवघ्या पंधरा किलोमीटरवर मलकापुरामध्ये येऊन पोहोचला आहे. त्यामुळे आता ग्रामस्थांमध्ये काळजीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे ग्रामस्थ प्रशासनाला मदत करत आहेत. एकंदरीत ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्तीने गाव बंद करण्याचा घेतलेला निर्णय योग्य असल्याच्या प्रतिक्रिया लोकांमधून येऊ लागल्या आहेत.
ग्रामपंचायतीच्यावतीने करोनाला प्रतिबंध करणे व गावाच्या सुरक्षेच्या दृष्टीने विविध उपाययोजना सुरू आहेत. गावात तीनवेळा जंतुनाशक फवारणी केली जात आहे. तसेच क्वारंटाईन केलेल्या लोकांवर आरोग्य केंद्रामार्फत लक्ष ठेवण्यात येत आहे. सर्वानुमते गावात बाहेरील लोकांना प्रवेश बंद केला आहे. ग्रामस्थांनीही सहकार्य करावे. संचारबंदीचे उल्लंघन करू नये.
सुवर्णा कापूरकर , सरपंच