संगमनेर (प्रतिनिधी) – तालुक्यातील झोळे गावांतर्गत असलेल्या गणेवाडी येथील खाणीत बुडून दोन सख्ख्या भावांसह त्यांच्या मामाचाही मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज घडली. या घटनेने संपूर्ण तालुक्यातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
याबाबत तालुका पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मयूर संतोष गाढवे (वय 12) व सूरज संतोष गाढवे (वय 15) हे दोघे सख्खे भाऊ पठारभागावरील कर्जुले पठार येथील राहाणार होते. ते आपले मामा संजय भाऊसाहेब खर्डे (वय 40, रा. गणेशवाडी, झोळे) यांच्याकडे आले होते. ते दोघे आज दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास शेळ्या चारण्यासाठी गणेशवाडी परिसरात गेले होते.
त्या परिसरातील पावसाच्या पाण्याने भरलेल्या एका खाणीत शेळ्या धूत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने मयूर व सूरज हे दोघे पाण्यात गटांगळ्या खाऊ लागले. त्याच वेळी मामा संजय खर्डे हे दोन्ही भाच्यांना वाचविण्यासाठी गेले. मात्र, मामा व भाच्यांना पोहता येत नसल्याने त्या तिघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला.
घटनेची माहिती समजताच आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर तिघांनाही पाण्यातून बाहेर काढून औषधोपचारासाठी रुग्णालयात आणण्यात आले. मात्र, त्यापूर्वीच ते मयत झाले होते. त्यानंतर तिघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी संगमनेर कुटीर रुग्णालयात आणण्यात आले. मामा व भाच्यांच्या दुर्दैवी मृत्यूने तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.
याप्रकरणी भाऊसाहेब कारभारी खर्डे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तालुका पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार तोडकरी हे करत आहेत.