मुंबई : आजपासून विधिमंडळाचे दोन दिवसीय हिवाळी अधिवेशन सुरु होत आहे. परंपरेनुसार नागपूरला होणारे हे अधिवेशन यंदा कोरोनामुळे दोन दिवसांचे आणि मुंबईत घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या दोन दिवसात विरोधी पक्ष सरकारला कोरोना, मराठा आरक्षण, शेतकरी मदतीवरुन घेरण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे सरकार या दोन दिवसात महत्वाची विधेयकं मंजूर करुन घेण्याच्या तयारीत आहे. यात प्रामुख्याने महिला व बाल अत्याचार प्रतिबंधक शक्ती कायद्यासंदर्भातील विधेयकाचा देखील समावेश आहे.
दोन दिवसांऐवजी दोन आठवड्याचं अधिवेशन घेण्याची मागणी विधानसभेचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तसेच कालच्या चहापानाच्या कार्यक्रमावर देखील विरोधी पक्षाने बहिष्कार घातला होता. दरम्यान, अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला म्हणजे काल राज्य सरकारने आयोजित केलेल्या चहापानावर विरोधी पक्षाने बहिष्कार घातला. काल संध्याकाळी 6 वाजता सह्याद्री अतिथीगृहावर चहापान आयोजित केले होते. मात्र या चहापानावर विरोधी पक्षाने बहिष्कार टाकला. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसांच्या हिवाळी अधिवेशनाच्या मुद्यावरून राज्य सरकारवर टीका केली आहे.
केवळ दोन दिवसांत हिवाळी अधिवेशन घेण्याच्या सरकारच्या या निर्णयाला भाजपकडून विरोध करण्यात आला. अवघ्या 2 दिवसांचं अधिवेशन घेणे म्हणजे चर्चेपासून पळ काढण्याचा प्रयत्न असल्याचा घणाघाती आरोप फडणवीस यांनी केला. विधिमंडळाच्या आजपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात सहा अध्यादेश, 10 विधेयके मांडण्यात येणार आहेत. गेल्या वर्षभरात मंत्रिमंडळाच्या बैठकीत 200 निर्णय घेण्यात आले असून त्यातील आठ महिने कोरोनाशी झुंज देण्यात गेली आहेत. कोरोना आणि बेमोसमी पाऊस या संकटांशी सामना करीत सरकार मार्गक्रमण करीत आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल सांगितले होते.
राज्य शासन गेल्या आठ महिन्यांपासून कोरोनासारख्या आजारासोबत यशस्वी लढा देत आहे. याकाळात जनहिताचे अनेक निर्णय घेण्यात आले, असे सांगतानाच हिवाळी अधिवेशनात अध्यादेश, विधेयक, पुरवण्या मागण्या, विनियोजन बिल, शोकसंदेश असे कामकाज असेल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते.