नवी दिल्ली : तृणमूल कॉंग्रेसचे शिष्टमंडळ ३१ डिसेंबरला मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांची भेट घेणार आहे. त्यावेळी पश्चिम बंगालमधील मतदारयाद्या पडताळणीशी (एसआयआर) संबंधित मुद्दे उपस्थित केले जाणार आहेत. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूलकडून प्रारंभापासून एसआयआरला विरोध दर्शवला जात आहे. त्या प्रक्रियेंतर्गत पडताळणीनंतर निवडणूक आयोगाने प्रारूप मतदार याद्या जारी केल्या. त्यामुळे बंगालमधील ५८ लाख २० हजार मतदारांची नावे हटवण्यात आल्याचे स्पष्ट झाले. वगळण्यात आलेल्या मतदारांमध्ये किती अवैध बांगलादेशी आणि रोहिंग्या आहेत, याविषयीची आकडेवारी प्रसिद्ध करा, असे आव्हान तृणमूलने निवडणूक आयोगाला दिले. आता त्या पक्षाचे १० सदस्यीय शिष्टमंडळ कुमार यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर आली. बंगालमधील १ कोटी ३१ लाख मतदारांशी संबंधित तार्किक विसंगती आढळल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. त्या मतदारांची यादी प्रसिद्ध करण्याचा आग्रह तृणमूलचे शिष्टमंडळ कुमार यांच्या भेटीवेळी धरणार आहे. बंगालमधील १ ते दीड कोटी मतदारांची नावे हटवण्याचे टार्गेट निश्चित करण्यात आले आहे का, असा सवाल त्या पक्षाने केला आहे.