चिंबळी – राजगुरूनगर ते चिंबळीफाटा प्रवास केला तरी स्थानिकांकडून सक्तीने टोलवसूल केली जाते; मात्र टोलकंपनीचे रस्ता देखभालीकडे दुर्लक्ष होत आहे. त्यांच्या दुर्लक्षामुळे पुणे-नाशिक महामार्गावर अपघाताला निमंत्रण मिळत आहे. महामार्गाला सेवा रस्ता नसल्यामुळे आणि सहापदरी होण्याच्या केवळ आश्वासनावर जीव मुठीत घेऊन या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांच्या मूलभूत गरजा देखील टोल कंपनी पूर्ण करत नसल्याने वाहनचालक संताप व्यक्त करीत आहेत.
चिंबळीफाटा या ठिकाणी दोन्ही बाजूला लोकवस्त्या असून दोन गावांना जाण्यासाठी या ठिकाणी फाटे आहेत. शिवाय औद्योगिक क्षेत्र असल्याने वाहने मुख्य रस्त्यावर येण्याचे प्रमाण देखील नित्याचे आहे असे असताना रस्त्याच्या साइडपट्ट्या खचल्या असून रस्ता आणि जमीन यात अंतर वाढले आहे, यामुळे रस्त्यावर वाहन चढवताना आणि रस्त्यावरून वाहन उतरवताना अडचणी येत असून वाहने घसरून अपघात नित्याचे झाले आहेत.
पादचाऱ्यांना देखील वाहनामधून उतरताना अडचणी येत आहेत, असे असताना मुरूम टाकून साइटपट्टे भरण्याकडे टोल वसूल करणारी कंपनी दुर्लक्ष करत आहे. इतर कामांबाबत देखील हीच बोंब असून मोशी मुख्य चौकातील हायमास्ट दिवा कित्येक दिवस बंद आहे. तुपेवस्ती येथील मोरीचा भराव खचून अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. दुभाजक आणि रस्ता याची उंची कमी झाली असून वाहने थेट दुभाजकावर चढण्याची भीती आहे.
मोशीतील भारत माता चौकात मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खडी पडली आहे ती उचलण्याकडे दुर्लक्ष होत आहे. काही ठिकाणी दुभाजक फोडले आहेत ते देखील बुजविण्यात आलेले नाहीत. चिंबळी, मोई, कुरुळी फाटा ओलांडण्यासाठी मुख्य रस्त्यावर बसविलेले सिग्नल देखील बंद आहेत ठिकाणी दुभाजकावरील लाइट रिफ्लेक्टर तुटलेली आहेत.
दुभाजकाचे रंग गायब झाले आहेत, शिवाय चिंबळीफाटा चौकात बसविलेला मोठा हायमास्ट विद्युत दिवा देखील सहा महिन्यांपासून बंद आहे या सगळ्या गोष्टीकडे टोलकंपनीचे दुर्लक्ष असून टोलवसुली मात्र जोरात सूरु आहे.यामुळे नागरिक नाराजी व्यक्त करत असून प्रशासनानेच आता यात लक्ष घालावे, अशी मागणी जोर धरीत आहेत.
मुदत कमी राहिल्याने कामांकडे दुर्लक्ष?
पुणे-नाशिक महामार्गावरील टोलवसुली करार 2023मध्ये संपणार असल्याचे समजते. यामुळे अवघी तीन वर्षे राहिल्याने कामे करण्याकडे कंपनी दुर्लक्ष करत असल्याचे नागरिक खासगीत बोलत आहेत. मुदत संपू अथवा मुदत वाढ मिळो पण येथील मूलभूत कामे तात्काळ केली जावीत अन्यथा टोल देण्याबाबत देखील विचार केला जाईल, असे मत वाहनचालक व्यक्त करीत आहेत.