महाविकास आघाडीतील जागावाटपावर उद्धव ठाकरे, शरद पवार, नाना पटोले यांच्यासह सर्वच महत्त्वाच्या नेत्यांनी शिवालय येथे महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद घेऊन जागावाटपाचे अंतिम सूत्र जाहीर केले. त्यातून महाविकास आघाडीतील एकजूट दृश्य स्वरूपात तरी लोकांपुढे दाखवण्यास महाविकास आघाडी यशस्वी ठरली आहे. या अंतिम सूत्रानुसार शिवसेनेच्या वाट्याला 21 जागा, काँग्रेसच्या वाट्याला 17 जागा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या वाट्याला 10 जागा आल्या आहेत.
दरम्यान, आघाडीचे घोडे तीन जागांवर अडले हेाते. त्यात भिवंडी, दक्षिण-मध्य मुंबई आणि सांगली या तीन महत्त्वाच्या जागांचा समावेश होता. सांगलीसाठी तिथल्या काँग्रेस नेत्यांनी मोठाच आटापिटा चालवला होता. मात्र मविआच्या जागावाटपात ठाकरे गटाने आग्रहाने मुंबईतील जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेतल्या. मुंबईत लोकसभेच्या एकूण सहा जागा आहेत. यापैकी चार जागांवर ठाकरे गट तर दोन जागा काँग्रेस पक्षाकडून लढवण्यात येणार आहेत.
अशात यंदाच्या लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या पैकी जनता कोणाला स्वीकारणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. यातच माध्यम समूहाने सुद्धा ओपिनयन पोलनुसार कुणाला कुठे किती मत मिळणार याचा निष्कर्ष लावला आहे.
वृत्तवाहिनी एबीपी माझाच्या ओपिनयन पोलनुसार मुंबईतील सहापैकी सहा जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी होण्याची शक्यता आहे. यापैकी केवळ दक्षिण मुंबई आणि ईशान्य मुंबईत काँटे की टक्कर पाहायला मिळू शकते. अन्यथा बाकी जागांवर महायुतीचे उमेदवार सहजपणे विजयी होऊ शकतात, असा निष्कर्ष एबीपीच्या ओपिनियन पोलमधून समोर आला आहे.
मुंबईतील उत्तर-मुंबई लोकसभा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. यंदा या मतदारसंघातून भाजपकडून पीयूष गोयल रिंगणात उतरले आहे. त्यामुळे या मतदारसंघात भाजपचा विजय जवळपास निश्चित आहे. परंतु, दक्षिण मुंबई, वायव्य मुंबई, दक्षिण मध्य मुंबई या तीन मतदारसंघांमध्ये ठाकरे गटाचे पारडे जड मानले जात होते. परंतु, एबीपी माझाच्या ओपिनियन पोलनुसार, दक्षिण मुंबईतून अरविंद सावंत, दक्षिण मध्य मुंबईतून अनिल देसाई आणि वायव्य मुंबईतून अमोल कीर्तिकर यांचा पराभव होण्याची शक्यता आहे. ईशान्य मुंबईत ठाकरे गटाचे संजय दिना पाटील हे भाजपच्या मिहीर कोटेचा यांना तगडी टक्कर देऊ शकतात. त्यामुळे प्रत्यक्ष निकालावेळी या एका जागेवरची परिस्थिती वेगळी असू शकते. मात्र, इतर सर्व ठिकाणी ठाकरे गटाच्या उमेदवारांचा पराभव होऊ शकतो. ही सगळी परिस्थिती ठाकरे गटाच्यादृष्टीने चिंताजनक मानली जात आहे.
हे वाचाल का ? गिरीश महाजनांनी एकनाथ खडसेंना लगावला टोला,’35 वर्षे आमदारकी, 20 वर्षे लाल दिव्याची गाडी, एकदा हरले की लगेच पक्ष बदलला’