satara | महाराणी येसूबाईंची कर्तुत्वगाथा इतिहासात आजही उपेक्षित

सातारा, (प्रतिनिधी) – स्वराज्याच्या कुलमुखत्यार महाराणी येसूबाई यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या वीरमरणानंतर जो मुत्सद्दीपणा दाखवला त्याला इतिहासात तोड नाही. छत्रपती राजाराम महाराज यांना जिंजीला पाठवण्यामध्ये येसूबाईंचा मोठा वाटा होता.
त्यांच्या या मुत्सद्देगिरीमुळे मुघल सम्राट औरंगजेबाला कधी स्वराज्य जिंकता आले नाही मात्र येसूबाईंच्या कर्तुत्व गाथेवर इतिहासाने म्हणावा तसा प्रकाश टाकला नाही, अशी खंत ज्येष्ठ इतिहास संशोधक राजेंद्र घाडगे यांनी व्यक्त केली.
महाराणी येसूबाई यांनी ४ जुलै 1719 रोजी औरंगजेबाच्या कैदेतून सुटल्यानंतर साताऱ्यात आगमन केले होते. हा दिवस येसूबाईंच्या आगमनाचा शौर्यदिन पाळला जातो. यानिमित्ताने संगम माहुली येथील येसूबाईंच्या समाधी परिसरामध्ये अभिवादन कार्यक्रम आणि त्यांच्या वरील व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी माहुली येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत आयोजित व्याख्यान पर कार्यक्रमात ते बोलत होते. हा उपक्रम येसूबाई फाउंडेशनचे अध्यक्ष सुहास राजेशिर्के व जिज्ञासा मंचचे नीलेश पंडित यांच्या पुढाकाराने राबवण्यात येतो.
घाडगे म्हणाले, येसूबाई या छत्रपती संभाजी महाराजांच्या केवळ पत्नीच नव्हत्या तर स्वराज्याच्या कुलमुखत्यार होत्या. ध्येयवादीपणा आणि राजकीय धुरंदरपणा हा त्यांच्यातील अंगभूत गुण होता. छत्रपती शिवरायांच्या आणि महाराणी जिजाऊ महाराजांच्या छायेमध्ये वावरत असताना त्यांनी स्वराज्याविषयीची निष्ठा आणि संतुलित व्यक्तिमत्त्वाचे सत्व अंगी बाणवले.
छत्रपती संभाजी महाराजांच्या वीर मरणानंतर स्वराज्याचा पुढील छत्रपती घडण्यासाठी त्यांनी राजाराम महाराजांना जिंजीला पाठवले इतिहासामध्ये त्यांनी घेतलेला हा धोरणात्मक निर्णय अतिशय महत्त्वाचा ठरला त्यानंतर मराठ्यांनी 25 वर्ष मुघल सम्राट औरंगाबाद ठेवले. स्वराज्याच्या जडणघडणीमध्ये येसूबाई यांचे मोठे योगदान आहे.
मान्यवरांचे स्वागत येसूबाई फाउंडेशनच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. सुरुवातीला उपस्थितांनी येसूबाईंच्या समाधीला अभिवादन केले.
नीलेश पंडित व सुहास राजेशिर्के, मुख्याध्यापक एस पी काटकर यांनी स्वागत केले. आजचा कार्यक्रम अत्यंत स्तुत्य बोधप्रद असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.
यावेळी कार्यक्रमास माहुली गावचे उपसरपंच अविनाश कोळपे ,सदस्य प्रकाश माने, मुख्याध्यापक एस व्ही काटकर, मंगलसिंग मोहिते ,पुजारी संकपाळ ,चिंचणी चे एस के जाधव, जयंत देशपांडे ,लीलाधर राजे भोसले, दिलीपराव गायकवाड इत्यादी उपस्थित होते.
कर्तुत्वगाथा आजच्या पिढीला कळायला हवी
औरंगजेबासारख्या मोगल सम्राटाच्या कैदे मध्ये 29 वर्षे काढणे ही त्यांच्या सत्वगुणांची परीक्षाच होती.
मात्र, येसूबाईंनी अत्यंत संयमाने ही परिस्थिती हाताळत हेही संकट निभावले. त्यांच्या या कार्यकर्तृत्वावर इतिहास आणि म्हणावा तसा प्रकाश टाकलेला नाही. महाराणी येसूबाईंनी स्वराज्यासाठी केलेला हा त्या आजच्या पिढीला म्हणावा तसा माहित नाही.
याशिवाय मृत्यूच्या तिथीविषयी सुद्धा इतिहासामध्ये संभ्रमावस्था आहे. अत्यंत थोर कारकीर्द घडलेल्या येसूबाईंच्या जीवनाविषयी इतिहासामध्ये अत्यंत तुटपुंजी माहिती उपलब्ध व्हावी हे दुर्दैवी आहे.
त्यांची कर्तुत्वगाथा आणि त्यापासून आजच्या पिढीला प्रेरणा मिळण्यासाठी असे शौर्य दिन दरवर्षी साजरे केले केले पाहिजेत. यासाठी येसूबाई फाउंडेशन आणि जिज्ञासा मंचचे काम कौतुकस्पद आहे, असे ते म्हणाले.





