Share Markets: वर्षाच्या शेवटच्या दिवशी, म्हणजेच बुधवारी, ३१ डिसेंबर रोजी बाजारात चौफेर तेजी पाहायला मिळाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ‘सेंसेक्स’ ५४५.५२ अंकांनी उसळला असून तो ८५,२२०.६० च्या उच्चांकी स्तरावर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या ‘निफ्टी’मध्येही १९०.७५ अंकांची मोठी वाढ होऊन तो २६,१२९.६० च्या पातळीवर स्थिरावला. विशेष म्हणजे केवळ बड्या कंपन्याच नाही, तर मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्येही गुंतवणूकदारांनी मोठी रस दाखवल्याने बाजारात सर्वत्र आनंदाचे वातावरण होते. या तेजीचे मुख्य कारण केंद्र सरकारने स्टील कंपन्यांना संरक्षण देण्यासाठी लागू केलेली सेफगार्ड ड्युटी ठरली आहे. या निर्णयामुळे पोलाद क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्सना मोठी उभारी मिळाली. त्याचबरोबर कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली घसरण आणि बाजारातील अस्थिरता कमी झाल्याने गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास दुणावला. आयटी आणि टेलिकॉम या दोन क्षेत्रांचा अपवाद वगळता इतर सर्व क्षेत्रांत आज जोरदार खरेदी झाली. यात प्रामुख्याने तेल, वायू, ऊर्जा, ऑटो आणि बँकिंग क्षेत्रातील शेअर्स आघाडीवर होते. गुंतवणूकदारांसाठी आजचा दिवस खऱ्या अर्थाने फायद्याचा ठरला. बीएसईमध्ये सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल ४७५.७० लाख कोटी रुपयांवर पोहोचले असून गुंतवणूकदारांच्या संपत्तीत आज सुमारे ३.९८ लाख कोटी रुपयांची भर पडली आहे. सेंसेक्समधील ३० पैकी २५ शेअर्समध्ये वाढ झाली असून टाटा स्टीलचा शेअर सर्वाधिक अडीच टक्क्यांनी वधारला. त्यापाठोपाठ कोटक महिंद्रा बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि ॲक्सिस बँकेच्या शेअर्सनी गुंतवणूकदारांना मालामाल केले. दुसरीकडे, आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी टीसीएस आणि टेक महिंद्राच्या शेअर्समध्ये मात्र घसरण पाहायला मिळाली. दिवसभरात एकूण २,७९९ शेअर्स वाढीसह बंद झाले असून १२६ शेअर्सनी वर्षभरातील आपली सर्वोत्तम कामगिरी बजावली.