मुंबई – काहीं राजकीय व्यक्तींनी राज्यात दंगलीसदृश परिस्थिती निर्माण होण्याची व्यक्त केलेली भीती आणि विशिष्ट समुदायाच्या लोकांकडून झालेले औरंगजेब आणि टिपू सुलतान यांचे उद्दत्तीकरण हा निव्वळ योगायोग असू शकत नाही असे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. नवी मुंबईत पत्रकारांशी बोलताना फडणवीस म्हणाले की, मुघल सम्राट औरंगजेबाचा गौरव करणारी कृत्ये महाराष्ट्रात खपवून घेतली जाणार नाहीत. लोकांना भडकवणाऱ्या लोकांना शोधून काढले जाईल आणि त्यांची चौकशी केली जाईल असेही त्यांनी म्हटले आहे.
अहमदनगरमधील मिरवणुकीत मुघल सम्राट औरंगजेबाचे फोटो काही तरुणांनी प्रदर्शित केल्याच्या पार्श्वभूमीवर आणि टिपू सुलतानच्या प्रतिमेसह आक्षेपार्ह ऑडिओ संदेश काही स्थानिकांनी सोशल मीडियावर स्टेटस म्हणून वापरल्याच्या आरोपावरून बुधवारी कोल्हापूर शहरात तणावाचे वातावरण होते. तेथे झालेल्या हिंसक प्रकाराच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. एका विशिष्ट समुदायाचे लोक औरंगजेबाचा गौरव करत असल्यामुळेच राज्यातील काही भागात दंगलीसारखी परिस्थिती निर्माण होत असल्याचा दावा फडणवीस यांनी केला. राज्यात दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण होऊ शकते, असे काही राजकारणी सांगत होते.
या नेत्यांच्या कमेंटला प्रतिसाद देत एका विशिष्ट समाजातील तरुणांनी औरंगजेबाचे फोटो प्रदर्शित केले. त्यांनी औरंगजेब आणि टिपू सुलतानचा गौरवही केला हा योगायोग म्हणता येणार नाही. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये अचानक या प्रतिमा का प्रदर्शित करण्यात आल्या आहेत? हे सहज किंवा आपोआप घडत नाही. हा निव्वळ योगायोग नसल्यामुळे आपल्याला या प्रकरणाचा सखोल तपास करावा लागेल असे ते म्हणाले. कोल्हापुरात विरोधी पक्षाच्या एका प्रमुख नेत्याने दंगल होणार याची जाणीव असल्याचे सांगितल्याने आश्चर्य वाटल्याचेही फडणवीस म्हणाले.
त्यांच्या विधानानंतर, तिथल्या काही तरुणांनी औरंगजेब आणि टिपू सुलतानचा गौरव केला आणि त्यानंतर त्यावर प्रतिक्रिया येते. विधान आणि हिंसक घटनांचा काही संबंध आहे का? औरंगजेबचा गौरव कोण करत आहे आणि कोण लोकांना असे करण्यास भडकवत आहे याचा आम्ही तपास करत आहोत. तपास संपल्यानंतर मी त्या गोष्टी उघड करेन, असे ते म्हणाले.
आदल्या दिवशी, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दावा केला होता की राज्यात कायदा आणि सुव्यवस्था प्रस्थापित करण्याची जबाबदारी राज्यकर्त्यांची आहे. जर सत्ताधारी पक्ष आणि त्यांचे लोक रस्त्यावर उतरून दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण करत असतील तर ते चांगले चिन्ह नाही असे पवार म्हणाले होत. फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शावर चालतो. काही नेत्यांनी औरंगजेबाला देशभक्त दाखवण्याचा प्रयत्न करताना आपण सर्वांनी पाहिले आहे. काही नेते एकाच भाषेत कसे बोलतात आणि त्यांना त्वरित प्रतिसाद कसा मिळतो याची चौकशी करावी लागेल असे ते पुढे म्हणाले.