इस्लामपूर -इस्लामपूर येथील एका बॅंकेतून जादा आलेले तब्बल 99 हजार 500 रुपये परत करून पाटील दाम्पत्याने प्रामाणिकपणा दाखविला. बॅंकेच्या अधिकाऱ्यांनी पाटील दाम्पत्याच्या प्रामाणिकपणाचे कौतुक केले. सोशल मीडियावरही याबाबत कौतुक होत आहे. इस्लामपूर मधील शिवनगर परिसरात हणमंत पाटील आणि त्यांच्या पत्नी सौ. मंदाकिनी पाटील राहतात. त्यांची आर्थिक परिस्थिती बेताचीच आहे. युनियन बॅंकेच्या इस्लामपूर शाखेत जन-धन योजनेचे पैसे जमा झाल्याची माहिती त्यांना मिळाली.
बुधवार दि. 22 एप्रिल रोजी पाटील दाम्पत्य बॅंकेत पैसे काढण्यासाठी गेले होते. दरम्यान बॅंक अधिकाऱ्यांच्या टायपिंग चूकीमुळे 500 ऐवजी 1 लाख रुपयांची रक्कम पाटील दाम्पत्यांना मिळाली. त्यांच्या मते ही रक्कम पंतप्रधान आवास योजनेची असावी म्हणून ती रक्कम घेवून ते घरी आले. त्यांनी प्रभाग क्रमांक सहामधील सामाजिक कार्यकर्ते सत्यवान रासकर यांना फोन करून बोलवून घेतले आणि पासबुक पाहून योजनेचे पैसे आले का? ते पाहण्यासाठी सांगितले. पासबुक पाहिल्या नंतर सत्यवान रासकर यांच्या लक्षात आले की ही रक्कम बॅंकेच्या चुकीमुळे जास्तीची देण्यात आली आहे. त्यानंतर सत्यवान रासकर व पाटील दाम्पत्य बॅंकेत गेले.
त्यावेळी बॅंकेत गोंधळाची अवस्था होती. तब्बल 99 हजार 500 रुपये जादा गेल्याने हिशोबाला ताळमेळ लागत नव्हता. सत्यवान रासकर यांनी बॅंकेच्या अधिकाऱ्यांना घडलेल्या प्रकारची माहिती सांगीतली. तेंव्हा बॅंकेच्या अधिकाऱ्यांनी पाटील दाम्पत्यांपुढे कृतज्ञता व्यक्त केली. खरे पाहता पाटील यांची परिस्थिती अगदी बेताची असताना देखील त्यांनी हे पैसे प्रामाणिकपणे परत केले. त्यामुळे शिवनगर परिसरात त्यांचे कौतुक होत आहे.