शिवसेनेच्या अवसानघातामुळे भाजपचा दारुण पराभव; राष्ट्रवादीचे वर्चस्व पुन्हा सिद्ध
धनंजय घोडके
वाई – वाई विधानसभा मतदारसंघात आमदार मकरंद पाटील यांचा करिष्मा कायम राहिल्याचे याही निवडणुकीत सिद्ध झाले आहे. या मतदारसंघातील जनतेने तिसऱ्यांदा आबांच्या बाजूने कौल दिल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. आबांच्या “नेटवर्क’पुढे मदन भोसलेंची “शायनिंग’ यंत्रणा कुचकामी ठरली. मतदारांनी विकासकामांना महत्त्व देऊन निव्वळ निवडणुकीपुरते समाजापुढे येणाऱ्या प्रवृत्तीला धुडकावले आहे. त्यातच शिवसेनेने अवसानघात केल्याने भाजपचा दारुण पराभव झाला.
वाई-महाबळेश्वर-खंडाळा विधानसभा मतदारसंघात महायुती विरुद्ध महाआघाडी अशी सरळ लढत झाल्याने निवडणुकीत रंगत निर्माण झाली होती. मकरंदआबा व मदन भोसले वगळता उर्वरित आठ उमेदवार मतदारांवर काहीच प्रभाव पाडू शकले नाहीत. जिल्हा परिषद, तिन्ही तालुक्यांमधील पंचायत समित्या, वाई बाजार समिती, नगरपालिका, खंडाळा, लोणंद नगरपंचायतीत बहुमत, पन्नास टक्के ग्रामपंचायतींमध्ये राष्ट्रवादीचे प्राबल्य असल्याने या मतदारसंघावर पक्षाची पकड मजबूत आहे. ऐन निवडणुकीच्या काळात अंतर्गत बंडाळी झाल्याने पक्षाला त्याची मोठी किंमत मोजावी लागणार, असे बोलले जात होते.
शिरवळ, खंडाळा, महाबळेश्वरमधील राष्ट्रवादीचे पदाधिकारी भाजपमध्ये गेल्याने पक्षाचा सफाया होईल, अशी स्वप्ने पाहणाऱ्यांच्या डोळ्यांमध्ये या निकालाने झणझणीत अंजन घातले आहे. कार्यकर्त्यांनी ही निवडणूक हातात घेतल्याने शिलेदार पक्षातून बाहेर पडल्याचा फारसा परिणाम झाला नाही. मकरंद पाटलांच्या परिपूर्ण नियोजनामुळे कार्यकर्त्यांनी घरोघरी प्रचारावर भर देऊन विजय सोपा केला. राष्ट्रवादीचा कोणताही मोठा नेता मतदारसंघात प्रचाराला आला नाही तरीसुद्धा आबांनी स्वतःच्या जीवावर व कार्यकर्त्यांच्या सहकार्याने विजय खेचून आणला. उलट मुख्यमंत्री व भाजपच्या इतर मोठ्या नेत्यांनी हजेरी लावूनसुद्धा ते आपल्या उमेदवारांचा पराभव थांबवू शकले नाहीत.
पक्षातील बंडोबांनी उचल खाण्याचा प्रयत्न केला तरी शेवटच्या क्षणी बाजी पलटवण्याची किमया मकरंदआबांना अवगत आहे. मतदारसंघात कॉंग्रेसचा विशेष प्रभाव दिसला नाही तरीसुद्धा आबांनी विजयश्री खेचून आणल्याने तालुक्यात राष्ट्रवादीच पुन्हा एकदा अव्वल पक्ष ठरला आहे. मोदींचा करिश्मा लोकसभा पोटनिवडणुकीत उदयनराजेंना निवडून आणू शकला नाही. या कमिश्म्याचा प्रभाव वाई मतदारसंघावरही पडला नाही. भाजपचे उमेदवार मदन भोसले यांनी शिवसेनेला गृहीत धरले. त्यांना कोणत्याही निर्णयात सहभागी करून घेण्यात आले नाही. त्यामुळे शिवसेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांशी राष्ट्रवादीशी सलोखा केला. मकरंद पाटलांनी हीच बाब नेमकी हेरली.
भाजपचा फाजील आत्मविश्वास मदन भोसले यांच्या पराभवास कारणीभूत ठरला. मदन भोसले यांचे अनेक पैलू असे आहेत की, ज्यामुळे शेतकरी वर्ग त्यांच्यावर विश्वास ठेवेल, असे वाटत नाही. भाजपने लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मदन भोसले यांना पक्षात घेऊन आपला जनाधार वाढविण्याचा प्रयत्न केला. त्यात ते काही अंशी यशस्वी झाले; परंतु आ. मकरंद पाटील यांनी आपले सर्व कौशल्य पणाला लावून विजय मिळवला. महायुतीला यश मिळाले नसले तरी त्यांच्या मतांचा टक्का वाढला आहे. या निवडणुकीत राष्ट्रावाडीला कडवे आव्हान मिळू शकले असते; परंतु त्यासाठी तळागाळापर्यंत काम आणि संपर्कात राहावे लागते, वंचित आघाडी व “नोटा’ फॅक्टरदेखील मतदारसंघात चालल्याचे अधोरेखित झाले आहे. वंचित आघाडी व “नोटा’ मिळून पाच हजार मते खाल्ली आहेत. ही चिंतेची बाब आहे.