नेवासा: नगर जिल्ह्यातील दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या शहापूर-घोटी-विशाखापट्टणम (राज्यमार्ग क्र. ५०) या मार्गाला आता ‘राष्ट्रीय महामार्ग’ म्हणून मान्यता मिळाली आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी यासाठी पाठपुरावा केला होता. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी या संदर्भात सकारात्मक निर्णय घेत सर्वेक्षणाचे आदेश दिले आहेत. हा मार्ग अकोले, संगमनेर, श्रीरामपूर, नेवासा आणि शेवगाव या तालुक्यातून जातो. या पट्ट्यात साखर कारखानदारी मोठी असल्याने उसाची वाहतूक मोठ्या प्रमाणावर होते. तसेच, शिर्डी, शनिशिंगणापूर, नेवासा, पैठण आणि माहूर यांसारख्या प्रमुख तीर्थक्षेत्रांना जोडणारा हा मुख्य दुवा आहे. सध्याचा रस्ता अरुंद असल्याने येथे अपघातांचे प्रमाण वाढले होते. ही बाब लक्षात घेऊन खासदार वाकचौरेंनी पावसाळी अधिवेशनात या मार्गाच्या विस्तारीकरणाची मागणी केली होती. नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनात मंत्री नितीन गडकरी यांनी या कामाला हिरवा कंदील दाखवल्याचे पत्र खासदारांना दिले आहे. बेलापूर-परळी रेल्वे मार्गानंतर आता या महामार्गाच्या मंजुरीमुळे उत्तर नगर जिल्ह्यात आनंदाचे वातावरण आहे. या महत्त्वपूर्ण विकासकामामुळे परिसरातील उद्योग आणि पर्यटनाला मोठी चालना मिळणार आहे.