कराड -करोना महामारीमुळे राज्यासह देशातील अर्थकारण ठप्प झाले आहे. याचा मोठा फटका अनेक छोटे मोठे व्यावसायिकांना बसला आहे. गणेशोत्सवासाठी कुंभार समाजाने येथे चार महिने सहकुटुंब काबाडकष्ट करून बनवलेल्या 60 ते 70 टक्के मूर्ती यावर्षी विकल्या न गेल्याने हा समाज आर्थिक अडचणीत सापडला आहे. लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे.
कराड शहराची ओळख राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक तसेच धार्मिक सण-उत्सव मोठ्या आनंदात साजरा करणारे शहर म्हणून आहे. कराडमध्ये असणारा कुंभार समाज या शहरासह तालुक्यातील लोकांना गणेश मूर्ती पुरवण्याचे काम करतो. घटस्थापना, संक्रांत या सणांसाठी घट व संक्राती तसेच बेंदूर सणासाठी बैलाबरोबर अंत्यविधीसाठी लागणारी मडकी अशा सेवा वर्षानुवर्षे देत आहे.
उत्कृष्ट मूर्तीकार अशी ओळखही या कराडच्या कुंभार समाजाची आहे. वर्षांत केवळ गणेशमूर्ती विक्रीच्या माध्यमातून या समाजाचे अर्थकरण चालते. यावर्षीही नेहमीप्रमाणे हा समाज सहकुटूंब आपले प्राण ओतून गणेशमूर्ती बनवत होता. बनवलेल्या मूर्तीची गणेशोत्सवापूर्वी दोन दिवसांत विक्री होत असते. परंतु, यावर्षी गणेशोत्सवाच्या पूर्वीच येथे करोनाने शिरकाव केला. बाजारपेठ बंद राहिल्यामुळे परिसरातील गावचे गणपती खरेदी करण्यासाठी येणारे ग्राहक आले नाहीत. काही गावात अन्य लोक बाहेरून तयार मर्ती आणन विक्री करत आहेत. त्याचा परिणाम कुंभार समाजाने बनवलेल्या मूर्तीच्या विक्रीवर झाला आहे.
व्यवसाय म्हणून जरी कोणीही गणेशमूर्ती विकू शकत असेल. परंतु, आजपर्यंत कुंभार समाजाने सांभाळलेली सामाजिक बांधिलकी सुद्धा तितकीच महत्त्वाची आहे. याचेही भान समाजाने ठेवावे, अशी अपेक्षा कुंभार समाजाकडून व्यक्त होत आहे. यंदा जवळपास 60 ते 70 टक्के गणेशमूर्ती शिल्लक राहिल्याने मूर्ती बनवण्यासाठी लागणारा खर्चही न निघाल्यामुळे कुंभार समाज आर्थिक अडचणीत सापडला आहे.