तक्रारी कमी झाल्याचा प्रशासनाचा दावा : तांत्रिक बाबी सोडविण्याकडे विशेष लक्ष
– प्रकाश गायकर
पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरामध्ये पाणीकपात सुरू झाल्यापासून सर्वांत जास्त टीका प्रशासनावर झाली. यावर प्रशासनानेही जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. अनधिकृत नळजोडांवर कारवाई करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. महापालिका प्रशासनाकडून सर्व उपाययोजनांची चाचपणी केली जात आहे. तसेच नागरिकांच्या पाणीटंचाईच्या तक्रारी घटल्या असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.
शहरातील जलवाहिन्यांचे लिकेज काढणे, जलशुद्धीकरण पंपाची दुरुस्ती कऱणे यासाठी 25 नोव्हेंबरपासून पाणीकपात सुरू केली. त्यामुळे शहरातील अर्ध्या भागात दररोज 480 एमएलडी पाणीपुरवठा केला जात आहे. यापूर्वी 480 एमएलडी पाणीपुरवठा संपूर्ण शहरात केला जात होता. त्यामध्ये बदल करून पाणीपुरवठा केला जात आहे. संपूर्ण शहराला होत असलेला पाणीपुरवठा अर्ध्या भागात केला जात असल्याने संपूर्ण दाबाने पाणीपुरवठा होत असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.
महापालिका प्रशासनाच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने अनधिकृत नळजोडांवर धडक कारवाई केली जात आहे. बिगरनिवासी व्यावसायिकांनी घेतलेल्या अनधिकृत नळजोडांचे सर्वेक्षण सुरू आहे. तसेच निवासी नळजोडला शुल्क व विलंब दंड भरून अधिकृत करण्याची कार्यवाही सुरू आहे. आतापर्यंत सुमारे 150 अनधिकृत नळजोडांवर कारवाई करण्यात आली आहे. यासोबतच जलवाहिनी दुरुस्ती सुरू आहे. जुन्या व गळक्या वाहिन्यांचे पाइप बदलण्यात येत आहेत. जलवाहिन्याच्या ज्या व्हॉल्वमधून पाणीगळती होत आहे. असे व्हॉल्व बदलले जात आहेत. जलशुद्धीकरण केंद्रांकडे विशेष लक्ष दिले जात आहे. निगडी सेक्टर क्रमांक 23 येथील जलशुद्धीकरण केंद्र व रावेत येथील अशुद्ध जलउपसा केंद्राची क्षमता वाढविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यंत्रांची देखभाल व दुरुस्ती करण्यात येत आहे. तांत्रिक बाबींवर लक्ष देऊन त्या सोडविण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत.
प्रशासन व राज्यकर्त्यांनी बोध घेण्याची आवश्यकता
शहरातील नागरिकांची रस्ते, वीज, पाणी पुरेशे मिळावे ही माफक अपेक्षा असते. या गरजा पूर्ण होण्यासाठीच नगरसेवकांना आपला प्रतिनिधी म्हणून महापालिकेत पाठवत असतात. पाणी माणसाची मूलभूत गरज आहे. स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू असलेल्या शहरातील नागरिकांना रस्ते, उड्डाणपूल, उद्याने याप्रमाणेच पाणीही महत्त्वाचे आहे. शहरात पाणीकपात सुरू केल्यामुळे अनेक सर्वसामान्य नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. यासाठीच दैनिक प्रभातने पेटलेले पाणी या वृत्तमालिकेतून या विषयावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला. यातून राज्यकर्ते व प्रशासनाने बोध घेऊन शहरातील नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा कसा करता येईल याकडे लक्ष द्यावे.
भूजलपातळी वाढविण्यावर भर
पिंपरी चिंचवड शहराची भूजलपातळी वाढविण्यासाठी मॅपिंग करण्यात येणार आहे. ज्या भागात भूजलपातळी कमी आहे, अशा भागात भूजलपातळी वाढविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. यासाठी प्रशासनाच्या वतीने भूजलतज्ज्ञांशी चर्चा करण्यात आली आहे. त्यानुसार लवकरच यासाठी सर्वेक्षण सुरू करण्यात येणार आहे. कमी भूजलपातळी असणाऱ्या भागात ती वाढविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. त्यामुळे शहरातील बोअरिंगला पाण्याची पातळी वाढेल.
अमृत योजनेला गती
शहरामध्ये ठिकठिकाणी 24 बाय 7 पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे. ही योजना 2019 मध्ये पूर्ण होईल असे आश्वासन नागरिकांना देण्यात आले होते. मात्र, हे काम पूर्ण करण्यास प्रशासनाला अपयश आले. आता या कामामध्ये गती आणण्याचा प्रयत्न प्रशासन करत आहे. त्यासाठी ठेकेदाराला वारंवार सूचना दण्यात येत आहेत.
आंद्रा व भामा आसखेड पाण्यासाठी प्रयत्न
पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प मार्गी लावण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न सुरू आहेत. आंद्रा व भामा आसखेड धरणातून पाणी आणण्यासाठी गेले अनेक वर्ष प्रयत्न सुरू आहेत. ही योजना कार्यान्वित करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवली जात आहे. आंद्रा धरण योजनेतील चिखली येथील जलशुद्धीकरण केंद्र व देहू बंधारा येथील पाणी उपसा केंद्राचे काम सुरू करण्यात आले आहे. तसेच भामा आसखेड धरण योजनेसाठी स्थानिक शेतकऱ्यांचा मोठा विरोध आहे. मात्र या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे दोन हप्त्यात निधी वर्ग करण्यात आला आहे.
एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू केल्यामुळे पाण्याच्या तक्रारी कमी झाल्या आहेत. पुरेशा दाबाने पाणीपुरवठा शहरातील सर्वच भागांमध्ये सुरू आहे. त्याचप्रमाणे पाण्याची गळती रोखण्यासाठी जलवाहिन्यांचे लिकेज काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. अनेक जलवाहिन्यांचे जुने जोड बदलले आहेत. पुढील काही दिवसांमध्ये सुरळीत पाणीपुरवठा नागरिकांना केला जाईल.
– मकरंद निकम, सहशहर अभियंता