पिंपरी – तुरुंगातील करोनाचा प्रसार रोखण्यासाठी कैद्यांना आकस्मिक रजेवर सोडण्याचा निर्णय गृहमंत्रालयाने घेतला. यामुळे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील 452 कैद्यांना सोडण्यात आले. आता लॉकडाऊन शिथिल झाल्यावर या आरोपींनी डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. यामुळे शहरातील वाहन चोऱ्या, घरफोडी, हाणामाऱ्या आणि खूनांच्या घटनांमध्ये गेल्या काही दिवसांत प्रचंड वाढ झाल्याची चर्चा पोलीस वर्तुळात सुरू आहे. आता ही गुन्हेगारी रोखायची तरी कशी, असा प्रश्न पोलीस अधिकाऱ्यांसमोर निर्माण झाला आहे.
यापूर्वी एखाद्या गुन्हेगाराला रजा घेण्यासाठी मोठी कसरत करावी लागत होती. त्यासाठी काहीतरी सबळ कारण देऊन कागदपत्रांची किचकट प्रक्रिया केल्यानंतरच काही अटी शर्तींवर रजा मंजूर केली जात होती. मात्र, करोनाचा धोका लक्षात घेता न्यायालयाच्या आदेशानुसार येरवडा मध्यवर्ती कारागृहातून अनेक गुन्हेगारांना जामीन, पीआर बॉण्ड आणि आकस्मिक अभिवचन रजा देण्यात आली. यामध्ये पिंपरी- चिंचवड शहरातील 452 सराईत गुन्हेगारांना सोडण्यात आल्याची नोंद पोलिसांकडे आहे. हे सराईत शहरात आल्याने पोलिसांची डोकेदुखी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
खुनाच्या गुन्ह्यात तुरूंगात असलेला सराईत गुन्हेगार अभिषेक गोसावी हा देखील करोनामुळे तुरूंगातून बाहेर आला. मात्र तुरूंगातून बाहेर येताच त्याने आपल्या साथीदारांच्या मदतीने लुटमार सुरू केली. मात्र ही बाब लक्षात येताच पोलिसांनी गोसावी याच्यासह त्याच्या साथीदारांवर मोकाची कारवाई करीत त्यांना पुन्हा तुरूंगात पाठविले.
करोनाचा बंदोबस्त, प्रशासनाच्या आदेशाकडे दुर्लक्ष करणाऱ्या नागरिकांवरील कारवाई यामुळे पोलिसांचे गुन्हेगारांकडे दुर्लक्ष झाले आहे. यामुळे गुन्हेगारांची वळवळ वाढली आहे. शहरातील निर्जन ठिकाणी होणारी गस्त बंद पडल्याने गुन्हेगारांना शहरालगत चांगले अड्डे मिळाले आहेत. या अड्ड्यांवर सध्या मैफिली रंगत आहेत. या मैफिलींमध्ये कट रचले जात आहेत. त्यातूनच पुनावळे येथे महाकालीच्या भावाचा तर दापोडी येथील नदीपात्रालगत एका तरुणाचा खून झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत.
जे आरोपी तुरूंगातून सुटतात, याची माहिती आम्हाला मिळते. ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तो गुन्हेगार आहे त्यांच्यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी संबंधित पोलीस ठाण्याची आहे. याशिवाय रात्रीच्यावेळी गुन्हे शाखेचे कर्मचारीही या गुन्हेगारांची तपासणी करतात.
– राजाराम पाटील, सहायक पोलीस आयुक्त.