जामखेड – गेल्या अनेक वर्षांपासून जामखेड तालुक्यात असलेल्या नांदणी नदीचे पात्र हे पूर्णपणे गाळात असल्याचे पाहायला मिळत होते. नदीपात्रात गाळ असल्यामुळे पाणी मुरत नव्हते. परिणामी परिसरातील गावकऱ्यांना त्याचा मोठ्या प्रमाणात फटका देखील बसत होता. आमदार रोहित पवार यांनी ही गोष्ट ओळखून त्यांची कर्जत-जामखेड एकात्मिक विकास संस्था व भारतीय जैन संघटना यांच्या मदतीने नांदणी नदीचे पुनरुज्जीवन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून काढण्यात न आलेला गाळ काढण्यात येणार असून नदीचे खोलीकरण देखील केले जाणार आहे. एकूण 22 किलोमीटरचे हे काम असून या माध्यमातून परिसरातील 17 गावांना या खोलीकरणाचा फायदा होणार असून, त्या भागात पाण्याची असलेली अडचण देखील दूर होण्यास मदत होणार आहे.
मतदारसंघातील नागरिकांनीही या उपक्रमात सक्रियपणे सहभाग नोंदवून खोलीकरण व गाळ काढण्यासाठी पूर्णपणे सहकार्य करण्याची तयारी दर्शवली आहे. बोर्ले येथे नांदनी नदीच्या पुनरुज्जीवनाच्या कामाचा शुभारंभ केला आहे. यावेळी पवार यांनी मतदारसंघात कोणतेही काम अपुरे राहणार नाही आणि सर्व अडचणी समजून त्या सोडवण्यासाठी सतत झटत राहणार असल्याचे सांगितले. गाळ काढल्यामुळे फायदा होणार आहे.