पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने अंतिम वर्ष वगळता अन्य सत्र अथवा वर्षातील विद्यार्थ्यांच्या निकालाचे गणितीय सूत्र निश्चित केले आहे. त्यानुसार निकाल जाहीर केला जाणार आहे. मात्र, त्यापूर्वी निकालात काही त्रुटी राहू नये, यासाठी संबंधित विषय तज्ज्ञांच्या समितीमार्फत पडताळणी होणार आहे. त्यामुळे योग्य पद्धतीने निकाल लागण्याची चिन्हे आहेत.
राज्य शासनाच्या निर्णयानुसार पदविका, पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षातील विद्यार्थी वगळून इतर विद्यार्थ्यांना 50 टक्के अंतर्गत मूल्यमापनावर आणि 50 टक्के पूर्वीच्या सत्रातील परीक्षेचे गुण विचारात घेऊन ग्रेड दिले जाणार आहे. त्याचे गणितीय सूत्र निश्चित केले असून, त्याचा तपशील परीक्षा विभागाने नुकताच प्रसिद्ध केला. त्यानुसार परीक्षा विभागाकडून निकालाची कार्यवाही सुरू आहे. यंदा परीक्षा न झाल्याने दरवर्षीप्रमाणे मूल्यमापन होणार नाही.
मात्र, ठरलेल्या सूत्रानुसार निकाल जाहीर होणार आहे. त्यात काही त्रुटी राहता कामा नये, अथवा काही निकाल कमी लागले अथवा फारच कमी गुण मिळाले, अशा काही शंका उपस्थित होता कामा नये, यासाठी संबंधित अभ्यासक्रमांच्या अधिष्ठातांच्या अध्यक्षतेसाठी चार-पाच जणांची समिती नेमण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला. ही समिती निकाल जाहीर करण्यापूर्वी त्याची शहानिशा करणार आहे. गुण योग्य पद्धतीने दिले गेले आहेत की नाही, त्याची सत्यता समितीच्या तज्ज्ञांमार्फत होणार आहे.
राज्य शासनाच्या निर्णयानुसार निकालाची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, अंतिम निकाल जाहीर करण्यापूर्वी त्या निकालाची सत्यता तपासण्यासाठी विषय तज्ज्ञांची समिती असेल. समितीने शहानिशा केल्यानंतर निकाल जाहीर केला जाणार आहे.
– डॉ. पराग काळकर, अधिष्ठाता, पुणे विद्यापीठ