Eknath Shinde Alandi : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ७५० व्या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त आयोजित हरिनाम सप्ताहाला राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी हजेरी लावली होती. संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या मंदिराशेजारील भक्त निवासाचे काम तातडीने सुरू करावे. त्यासाठी नगरविकास विभागाकडून २५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जाणार असल्याची महत्वपूर्ण घोषणा शिंदे यांनी यावेळी बोलताना केली. तसेच भक्त निवासामुळे वाकऱ्यांची सोय होणार असून दिलेला शब्द मी पाळतो असे म्हणत निधीची चिंता करू नये, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. साडेचारशे एकर जागेमधील ज्ञानभूमीचे काम टप्प्याटप्प्याने सरकारच्या मदतीने केले जाईल. महायुतीचे सरकार वाकऱ्यांमुळे आले आहे. त्यामुळे आळंदीत जे काही करायचे ते काम केले जाईल. गेली ७५० वर्षे ज्ञानेश्वरीच्या प्रकाशात वाटचाल सुरू आहे. मानवता, सेवाभाव आणि योगसाधनेचे महत्त्व ज्ञानेश्वरीने सांगितले आहे, असे देखील शिंदे म्हणाले. इंद्रायणी नदी स्वच्छतेची जबाबदारी शासनाची आळंदीतील इंद्रायणी नदीच्या प्रदुषणाविषयी देखील शिंदे यांनी भाष्य केले. ते म्हणाले, इंद्रायणी नदी प्रदुषणमुक्त, स्वच्छ झाली पाहिजे अशी वाककऱ्यांची इच्छा आहे. केंद्र आणि राज्य सरकार मिळून नदी स्वच्छतेचे काम करेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री उदय सामंत यांनी नदी स्वच्छ करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. नदी स्वच्छतेची जबाबदारी शासनाची आहे. जे काय लागेल ते केले जाईल. पण इंद्रायणी नदी स्वच्छ, शुद्ध, प्रदुषणमुक्त केली जाईल, नदी स्वच्छतेच्या कामाला या वर्षी प्रारंभ होईल, अशी ग्वाही शिंदे यांनी दिली. यावेळी केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, विधान परिषदेच्या उपसभापती डाॅ. नीलम गोऱ्हे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार विजय शिवतारे, उत्तम जानकर, आळंदी देवस्थानाचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ, पालखी सोहळाप्रमुख डॉ. भावार्थ देखणे उपस्थित होते.