पुणे – “देवराई’ या नावातच किती प्रसन्नता आहे. जर आपल्याला ही “देवराई’ उभारण्याचा आनंद सहजतेने मिळाला तर आणखी काय हवे? “देवराई फाउंडेशन’ने मार्गदर्शकाची भूमिका निभावण्यात पुढचे पाऊल टाकले आहे.
मानवनिर्मित “देवराई’ आणि “घनवन’ उभारण्यासाठी विनामूल्य सहकार्य करण्याचा निर्णय फाउंडेशनने घेतला आहे. यामध्ये एक एकर जागेत 119 प्रकारच्या 515 वनस्पती आणि त्या लागवडीचा आराखडाही विनामूल्य दिला जाणार आहे. वृक्षतोड ही समस्या सध्या जगभराचीच झाली आहे. यामुळे तापमानवाढीचा फटका सगळ्या विश्वालाच बसला आहे. त्यातून मानवनिर्मित देवरायाही नष्ट होत आहेत. त्यातरी किमान सांभाळता याव्यात, यासाठी या “देवराई’ उभारण्याचे काम “देवराई फाउंडेशन’ने हाती घेतले आहे. या उपक्रमाला सामाजिक जोड हवी आहे.
आम्ही महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, बडोदा येथे सुमारे 200 देवराया लागवड केल्या आहेत. आगामी काळात एक हजार देवराई करण्याचा संकल्प आहे. वृक्ष तोडीमुळे वातावरण बदल झाले आहेत. याला पर्याय म्हणून प्राचीन परंपरेतील देवराईची निर्मिती व्हावी यासाठी विनामूल्य रोपे आणि मार्गदर्शन केले जाणार आहे.
– रघुनाथ ढोले, मॅनेजिंग ट्रस्टी, देवराई फाउंडेशन
देवराई म्हणजे काय?
या शब्दाचा मूळ अर्थ हा देवाच्या नावाने राखलेले आणि पवित्र समजले जाणारे वन. पूर्वी याठिकाणी अगदी दुर्मिळ, औषधी वनस्पती लावल्या जात असत. जंगल हे अनेकदा मानवनिर्मित नसते, परंतु देवराई ही मानवनिर्मित आहे. जेव्हा शेतीसाठी जंगलतोड सुरू झाली तेव्हा जंगलाचे महत्त्वदेखील लक्षात आले असावे. त्यातून मानवाच्या देवावरील श्रद्धायुक्त भीतीचा योग्य वापर जंगलाच्या रक्षणासाठी आणि संवर्धनासाठी देवराईंची निर्मिती केली आहे. “देवराई’चे मूळ वैदिक संस्कृतीपासून सुरू झाल्याचे दिसून येते. यातही अनेक मतप्रवाह आहेत; परंतु मूळ गाभा हा निसर्गाप्रती श्रद्धा हाच असल्याचे दिसून येते. देवरायांची निर्मिती, त्यांचे संवर्धन आणि अस्तित्त्व यालाही मोठी परंपरा आहे. शक्यतो पाणी ज्या ठिकाणी मुबलक उपलब्ध असते अशा ठिकाणी या देवराई असतात. त्यामुळे प्राणी, पक्षी यांचे वसतिस्थानही यांना म्हणता येते. त्याचा चांगला उपयोग होतो. एका सर्वेक्षणात असे आढळून आले आहे की, प्राण्यांच्या अनेक दुर्मिळ, नष्ट होत असलेल्या प्रजाती, धोक्याच्या पातळीवर असलेल्या प्रजाती फक्त देवरायात आढळतात.