पारनेर -पारनेर तालुक्यातील नारायणगाव येथे आयटीसी कंपनीच्या सीएसआर फंडातून जलसंधारणाची कामे करण्यात आली होती. त्यासाठी पंचायत समितीचे सभापती गणेश शेळके यांनी पुढाकार घेतला होता. रविवारी (दि.31) झालेल्या पहिल्याच पावसात बंधारे व नाले भरले आहेत.
सभापती गणेश शेळके यांच्या प्रयत्नातून आयटीसी कंपनीच्या सीएसआर फंडामधून नारायणगव्हाण येथे जाधवदरा, कोहकडेदरा येथे जलसंधारणाची कामे करण्यात आली. रविवारी झालेल्या पहिल्याच पावसात हे बंधारे तुडुंब भरले आहेत.
सीसीटी चर, 27 विहिरी पूर्ण भरून वाहात आहेत. यापुढेही संपूर्ण गाव 100 टक्के पाणीदार करण्याचा संकल्प केला अहे. गावामध्ये जवळपास 18 ते 20 महिन्यांपासून अविरत काम चालू आहे. त्याच प्रमाणे गावातील ग्रामस्थांचे लाभलेले योगदान व कंपनीचे अधिकारी व पदाधिकारी यांचे असलेले योगदान व सहकार्य माझे गाव नक्की सुजलाम, सुफलाम होणार आहे. पाऊस पडल्याने केलेल्या कामामध्ये पाणी साचले आहे. त्यामुळे कामाचे चीज झाले आहे. लवकरच सभापती शेळके व कंपनीचे वरिष्ठ अधिकारी गावाला भेट देणार आहेत, अशी माहिती सरपंच सुरेश बोरुडे व काशिनाथ नवले यांनी दिली.
रांजणगाव एमआयडीसीच्या माध्यमातून गेल्या चार ते पाच वर्षांपासून आयटीसी कंपनीच्या माध्यमातून यादववाडी, मावळेवाडी व आता नारायणगव्हाण गावात जलसंधारणाची कामे केली. गेल्या पाच वर्षांपासून हे काम अविरत चालू आहे. या पुढील काळात आणखी गावांमध्ये विविध कंपन्यांच्या माध्यमातून हा उपक्रम राबवणार असल्याचे सभापती शेळके यांनी सांगितले.