जळगाव: देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ खडसे यांच्यातील वाद सर्वांनाच माहित आहे. अशा वादांकित पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एकनाथ खडसे यांच्या बद्दल विचारण्यात आले असता त्यांनी त्या प्रश्नाला दिल्लीकडे बोट दाखवत पद्धतशीर बगल दिली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाजनादेश यात्रे निमित्त भुसावळ येथे आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी तुमच्या नव्या मंत्री मंडळात एकनाथ खडसे यांचा समावेश असणार का असा प्रश्न मुख्यमंत्र्यांना विचारण्यात आला होता. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले की खडसेंच्या मंत्री मंडळ समावेशावर मी निर्णय घेऊ शकत नाही. त्यांच्या समावेशाचे सर्व अधिकार आमच्या दिल्लीतल्या नेत्यांकडे आहेत. त्यांनी राज्यात राहायचं की केंद्रात जायचं की अन्य कोणत्या पदावर जायचे याचा निर्णय सर्वस्वी दिल्लीतील नेते घेऊ शकतात असा तर्क पत्रकारांपुढे मांडून देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ खडसेंविषयी बोलण्याला पूर्णविराम दिला.
दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची यात्रा १३ किलोमीटर प्रवास आणि १४ जिल्हे पूर्ण करून आता मराठवाड्यात जाणार आहे. १ सप्टेंबर रोजी या यात्रेचा सोलापूर या ठिकाणी समारोप होणार आहे. या समारोपाला नरेंद्र मोदी अथवा अमित शहा यांची हजेरी असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.