प्रा. डी. के. वैद्य
अकोले -अकोले तालुक्याच्या दक्षिणेच्या ढग्याडोंगरा पलीकडील आणि उत्तरेला गर्दनी-शेरणखेलच्या पलीकडे डोंगराच्या जवळपास वीस किलोमीटरच्या क्षेत्रात काल सकाळी सव्वासहा ते साडेसात यादरम्यान वरुणराजाने इंद्रधनुष्याचे विहंगम दृश्य घडवले. त्यामुळे पहाट प्रेमी आणि इतर सर्वच जनतेने या विहंगम व अनोख्या अशा निसर्ग चमत्काराचा पुरेपूर आनंद लुटला.
शंभर वर्षांपूर्वी बालकवी तथा त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांनी ‘श्रावण मासी हर्ष मानसी’ ही कविता रचली होती. गेले अनेक वर्षे, अनेक दशके ही कविता बालभारतीच्या पाठ्यपुस्तकात अनेकांनी अभ्यासली आहे. ही निसर्ग कविता म्हणजे खऱ्या अर्थाने बालकवींची संवेदनशीलता, बालकवींचे निसर्ग वाचन आणि बालकवींचे सूक्ष्म निरीक्षण दर्शवणारी कविता होय. या कवितेत खऱ्या अर्थाने लोकांना इंद्रधनुष्याचा गोफ विणलेला पाहायला मिळाला, हे अहोभाग्यम होते.
काल सकाळी जवळजवळ दीड तास हा निसर्गाचा नजराणा हा खऱ्या अर्थाने ज्यांनी ज्यांनी पाहिला, त्यांना खऱ्या अर्थाने बालकवींच्या कवितेची आठवण म्हणजे खऱ्या अर्थाने काल दिसलेले ठळक असे इंद्रधनुष्य होय. असे इंद्रधनुष्य कदाचित गेल्या अनेक दशकांमध्ये पाहायला मिळाले नसावे, असे हे दृश्य होते. हे विहंगम दृश्य म्हणजे ‘इंद्रवज्रा’ची आठवण करून देणारे असे ठळक दृश्य होते.
खऱ्या अर्थाने इंद्रधनुष्य तेव्हा अर्धाकार असते तेव्हा ते इंद्रधनुष्य असते. पण जेव्हा ते गोलाकार असते तेव्हा त्याला ‘इंद्रवज्र’ असे म्हटले जाते. हरिश्चंद्रगडाच्या कोकणकड्याचीच्या तिथे अनेकदा हा इंद्रवज्राच्या अनोखा दृश्याचा अनुभव पर्यटकांनी घेतला आहे आणि हे ठिकाण अकोले तालुक्यामध्ये आहे यातच सर्व आले.
‘वरती बघता इंद्रधनुचा गोफ दुहेरी विणलासे । मंगल तोरण काय बांधले नभोमंडपी कुणी भासे’ कालचे हे इंद्रधनुष्य खऱ्या अर्थाने हे आकाशामध्ये बांधलेले मंगल तोरण दिसावे असे होते. अशाप्रकारचे हे दृश्य जेव्हा दिसते, तेव्हा बालकवींच्या काव्यपंक्तीमध्ये आढळणारा पुढचा काव्यभाग लक्षात घेणारा निसर्गाचा एक दुसराही चमत्कार दिसत होता.
‘झालासा सूर्यास्त वाटतो, सांज अहाहा तो उघडे । तरु शिखरांवर, उंच घरांवर पिवळे पिवळे ऊन पडे’ सकाळच्या या सूर्योदयाच्या पार्श्वभूमीवर कोवळे पडणारे पिवळसर ऊन सातारा डोंगराच्या, थोरला बुधल्याच्या, ढग्या किंवा अन्य डोंगररांगात हळूहळू पसरले. वेळ सकाळची…पण सूर्यास्ताची आठवण करून देणारा तो प्रसंग होता आणि त्या पार्श्वभूमीवर इंद्रधनुष्याची मजा अनुभवणे मोठे वेगळेच दृश्य अनुभवण्यास मिळाले.