कराड : येथील अनेक वर्षांपासून प्रलंबित असणारा मुस्लिम समाज दफनभूमीचा प्रश्न खा. श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नातून अखेर निकाली निघाला आहे. याबाबत मुस्लिम बांधवांनी खा. पाटील यांची भेट घेऊन आभार मानले.
वहागाव येथील मुस्लिम समाज दफनभूमीच्या जागेचा प्रश्न गेली कित्येक वर्षे प्रलंबित होता. त्यामुळे येथील मुस्लिम बांधवांना दफन विधीसाठी अनेक अडचणी येत होत्या. तर शासनाकडून दफनभूमीच्या विकासासाठी मिळणारा निधी तांत्रिक अडणीमुळे उपलब्ध होत नव्हता.
दफनभूमीच्या जागेचा प्रश्न मिटावा म्हणून स्थानिक नागरिक अनेक वर्षांपासून प्रयत्नात होते. मात्र, त्यामध्ये वेळोवेळी अडथळे येत होते. यासंदर्भात मुस्लिम बांधवानी खा.श्रीनिवास पाटील यांना प्रत्यक्ष भेटून यामध्ये आपण लक्ष घालून हा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढावा, अशी मागणी काही दिवसांपूर्वी केली होती.
खा. श्रीनिवास पाटील यांनी जिल्हाधिकारी यांच्याशी समन्वय साधून यासाठी प्रयत्न केले.
तर प्रशासकीय त्रुटी दूर केल्या गेल्याने दफनभूमीसाठी सार्वजनिक जागा मुस्लिम समाजाला देण्यात आली आहे. खा. श्रीनिवास पाटील यांनी वारंवार केलेल्या पाठपुराव्याने दफनभूमीचा प्रश्न कायमस्वरूपी सुटला आहे. त्यामुळे वहागाव येथील मुस्लिम बांधवांनी खा. श्रीनिवास पाटील यांची भेट घेऊन आभार मनापासून मानले.