नगर – विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या अखेरच्या तीन दिवसांत प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी राज्यस्तरीय नेत्यांच्या जाहीरसभांचे आयोजन करण्यात आल्याने आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीने शेवटच्या टप्प्यात प्रचाराचा बार उडणार आहे. प्रचारासाठी असलेला अल्प कालावधी पाहता, सर्वच उमेदवारांची धावपळ उडाली आहेत.विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासूनच उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी सुरुवात केली होती. तथापि, यंदा उमेदवारी अर्ज दाखल करणे व प्रत्यक्ष मतदानाचा दिवस यात फक्त तीन आठवड्यांचा कालावधी मिळाल्याने सर्वच उमेदवारांची दमछाक झाली.त्यातही राजकीय पक्षांच्या उमेदवारांसाठी स्टार प्रचारकांच्या जाहीरसभा, रोड शोचे आयोजन करण्यात आल्याने त्यांच्या दौऱ्यात सहभागी होणे उमेदवारांना क्रमप्राप्त ठरल्याने उमेदवारांचा बराचसा कालावधी वाया गेला. प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात राजकीय चित्र स्पष्ट झाल्यानंतर उमेदवारांची एक प्रचार फेरी पूर्ण झाली. परंतु मतदारसंघाचा विस्तार पाहता मतदारांपर्यंत पोहोचणे उमेदवाराला शक्य नसल्याने त्यांच्या वतीने नातेवाइकांकडे धुरा सोपविण्यात आली. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील उमेदवारांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, केंद्रीयमंत्री स्मृती इराणी, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, पक्षाचे नेते खासदार अमोल कोल्हे, अजित पवार, छगन भुजबळ आदीच्या प्रचार सभा झाल्या. आता तीन दिवसात प्रचाराचा बारच उडणार आहे. शनिवारी दि. 19 रोजी सांयकाळी पाच वाजता निवडणूक प्रचाराची सांगता होणार असल्याने त्यापूर्वी भाजपचे अध्यक्ष अमित शहा, पंकजा मुंडे, धनजंय मुंडे, शरद पवार यांच्या सभा होणार आहेत.