पिंपरी (प्रतिनिधी) – शहरातील करोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता फळे विक्रीसाठी चारच तासांची वेळ दिली आहे. त्यामुळे अक्षय्य तृतीयेच्या आदल्या दिवशी आंबा खरेदीसाठी नागरिकांची लगबग सुरू होती. रत्नागिरी आणि देवगड हापूस आंबा 500 ते 800 रुपये डझन या दराने विकला गेला. तर, बदाम आणि लालबाग आंब्यानेही चांगलाच भाव खाल्ला.
अक्षय्य तृतीयेपासून आंबा खाण्यास सुरुवात होते. त्यामुळे आज आदल्या दिवशी शहरात विविध ठिकाणी लावलेल्या फ्रुट स्टॉलवर तसेच महापालिकेने सुरू केलेल्या फळे व भाजीपाला केंद्रांमध्ये आंब्याची विक्री सुरू होती. हापूस आंब्याची शहरातील बाजारपेठांमध्ये कमी आवक झाली. 500 ते 800 रुपये डझन या दराने दोन्ही आंबे विकले जात होते. तर, 5 डझनांपासून 8 डझनापर्यंतच्या आंब्याच्या पेट्या उपलब्ध होत्या. 2 हजारांपासून 3 हजारांपर्यंत त्यांचे दर होते. सध्या लॉकडाऊनमुळे कोकणातून आंबा पोहचण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे आंब्याचा पुरवठा कमी आहे. यामुळे यंदा दर जादा असल्याचे आंबा विक्रेत्यांनी सांगितले. अन्यथा अक्षयतृतीयेच्या काळात 300 ते 400 रुपये डझनापर्यंत हा आंबा मिळतो.
रत्नागिरी हापूसची करावी खातरजमा
चेन्नई येथून आलेल्या मद्रास आंब्याला, तसेच कर्नाटक हापूसलाही रत्नागिरी हापूस सांगून काही विक्रेते विकत असल्याची माहिती एका विक्रेत्यानेच दिली. चेन्नई येथून आलेला आंबा हा पिवळसर असतो आणि कोय मोठी असते. रत्नागिरी हापूस देखील पिवळसर असतो. त्यामुळे ग्राहकांची फसवणूक होत आहे. नागरिकांनी खातरजमा करूनच रत्नागिरी हापूस आंबा घ्यावा. आंब्याला रंग येण्यासाठी काही विक्रेते चायना पुडीचा वापर करत असल्याचेही त्याने नमूद केले.
बदाम, लालबागही तेजीत
बदाम आणि लालबाग आंबाही सध्या तेजीत आहे. बदाम आंबा 140 ते 160 रुपये किलोने तर, लालबाग 160 ते 200 रुपये किलो या दराने विकला जात आहे. बदाम आंब्याचे दर एकाच दिवसामध्ये 20 ते 40 रुपये प्रति किलोने वाढले आहेत. कर्नाटक, बंगळुरू येथून होणाऱ्या आंब्याच्या वाहतुकीत अडथळे येत असल्याने संबंधित आंब्याची आवक कमी आहे. तुलनेत मागणी जास्त असल्याने किंमती वाढल्या आहेत.