पुणे- महाराष्ट्र राज्यातील राजकारण गेल्या दोन-चार महिन्यांत आरोप-प्रत्यारोपांच्या राजकारणाने ढवळून नव्हे तर गढूळ झाले आहे. करोना रुग्ण वाढीचे संकट, वीजटंचाई, इंधन दरवाढ, महागाई असे सामान्य जनतेचे प्रश्न मागे पडले असून, कोट्यवधींचा भ्रष्टाचार, गैरव्यवहार, ईडी कारवाई, तरुंग, कोठडी आणि जातीपातीचा भोंगा.., असे शब्द कानावर पडत आहेत. “एक दिवस सुखाचा’ एवढी माफक अपेक्षा असलेल्या महाराष्ट्रातील जनतेला अशा राजकारणाचा वीट आलेला असतानाच यामध्ये आता आणखी काही सभांची भर पडणार आहे. यातून सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांची जिरवा-जिरवीचेच राजकारण नागरिकांना पाहायला मिळणार आहे.
1 मे महाराष्ट्र दीन महाविकास आघाडीची अलका चौकात सभा….
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या औरंगाबादमध्ये महाराष्ट्र दिनी (दि. 1 मे) होणाऱ्या जाहीर सभेला अद्याप पोलिसांची परवानगी मिळाली नसली तरी कोणत्याही परिस्थितीत सभा घेणारच, यावर मनसे ठाम आहे. राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे खाली उतरविण्यासाठी दि. 3 मे पर्यंतचा “अल्टिमेटम’ दिला असल्याने औरंगाबादच्या सभेकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. तत्पूर्वी गुढीपाडव्याला घेतलेल्या सभेत राज ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर मिश्किल, खोचक शब्दांत टीका केली होती. औरंगाबादमधील सभेतही हेच नेते टार्गेट होणार, असा तर्क लावून आता ठाकरे यांच्या सभेला उत्तर देण्यासाठी महाविकास आघाडी सरकारमधील तीनही पक्ष एकत्रित सभा घेणार आहेत. भोंगे आणि हनुमान चालिसा, हे मुद्दे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना चांगलेच अडचणीचे ठरले आहेत. राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, अजित पवार, जयंत पाटील यांच्यावरही बोचरी टीका केली आहे. त्यामुळे त्याला उत्तर देण्यासाठी महाविकास आघाडीने पुणे शहरात जाहीर सभा आयोजित केली आहे. अलका टॉकीज चौकात दि. 30 एप्रिलला ही सभा होणार आहे. या सभेला तीनही पक्षांमधील नेते आणि मंत्री उपस्थित राहणार आहेत. विशेष म्हणजे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे त्याच दिवशी पुणे शहरात असणार असून ते औरंगाबादच्या सभेची तयारी पुण्यातून करणार आहेत. दुसऱ्या दिवशी औरंगाबादमध्ये ते सभा घेणार आहेत.
1 मे महाराष्ट्र दीन मुंबईत भाजपची हल्लाबोल सभा…
पुण्यात महाराष्ट्रदिनी महाविकास आघाडीची सभा होत असताना भारतीय जनता पक्षानेही आपल्या सभेची जोरदार तयारी केली आहे. दि. 1 मे या दिवशी भाजपही मुंबईत जाहीर सभा घेत आहे. विरोधी पक्षनेते, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल करण्याच्या तयारीत आहेत.
मुंबई मनपातील भ्रष्टाचाराची पोलखोल करणार असल्याचा स्पष्ट इशारा भाजपकडून देण्यात आला आहे. करोनामुळे मर्यादेत कार्यक्रम घेणाऱ्या भाजपनेही पहिल्यांदाच मोठा आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीसह महाराष्ट्र दिन साजरा करण्याची तयारी केली आहे. मुंबई येथील सोमय्या मैदानात राज्यभरातील हजारो कार्यकत्यांच्या उपस्थितीत फडणवीस यांची सभा होणार आहे. शिवसेनेसह महाविकास आघाडीवर ते कडकडीत शब्दांत तडाखे देणार असल्याचे सांगितले जात आहे.
14/15 मे उद्धव ठाकरे यांची विशेष सभा
पुणे, औरंगाबादमधील सभा झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची दि. 14 आणि दि. 15 मे या दिवशी मुंबईतील बीकेसी मैदानावर शिवसेनेचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. सभेला उत्तर सभेतूनच देईन, असे यापूर्वीच शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घोषित केलेले आहे. त्यानुसार सर्व सभा झाल्यानंतर शिवसेनेकडून मुख्यमंत्री ठाकरे यांच्या मुंबईतील बीकेसीमधील मैदानात होणाऱ्या सभेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. शिवसेनेच्या राज्यव्यापी शिवसंपर्क अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात या सभेतून होणार असल्याचे सांगितले जात आहे. यावेळी मिुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मनसे आणि भाजपचा समाचार घेणार, हे निश्चित आहे.
पुण्यातून मनसेच्या 250 गाड्या जाणार….
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या औरंगाबाद येथील सभेला पोलिसांकडून परवानगी देण्यात आलेली नाही. तरीही मनसेकडून सभेची जय्यत तयारी सुरू आहे. विशेष म्हणजे औरंगाबादच्या सभेआधी राज ठाकरे दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर आहेत. पुण्यातच राज ठाकरे यांच्या सभेबाबत नियोजन होणार आहे. तसेच, राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याचेही नियोजन केले जाणार आहे. राज ठाकरे जेव्हा पुण्याहून औरंगाबादला जाणार तेव्हा 200 ते 250 गाड्यांचा ताफा पुण्यातून जाणार आहे. पुण्यातील त्यांच्या दौऱ्याचा कार्यक्रमाच्या वेळा सध्या तरी गुलदस्यात ठेवण्यात आल्या आहेत.
सभांमधील वादळी वाक्य…
राज ठाकरे यांनी घेतलेल्या सभेत महाविकास आघाडीतील काही मंत्र्यांवर खोचक शब्दांमध्ये टीका करताना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जयंत पाटील यांचा “जंत’ पाटील असा उल्लेख करीत खिल्ली उडवली होती. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनाही “नाग’ म्हणत टोला लगावला होता. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर सडकून टीका झाली होती. या टीकेला नंतर उत्तर देताना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी राष्ट्रवादीच्या संकल्प यात्रेत राज ठाकरे यांचा “खाज’ ठाकरे असा उल्लेख केला होता. मिटकरी यांचे हे भाषण वादग्रस्त ठरले होते. विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे एकट्या मिटकरींनी राज ठाकरे यांच्यावर केलेली टीका मनसेच्या प्रचंड जिव्हारी लागली आहे.