Ajit Pwar plane crash report: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या प्राथमिक चौकशी अहवालात धक्कादायक माहिती समोर आली आहे. विमान उतरवण्यासाठी किमान ५,००० मीटर दृश्यमानता आवश्यक असताना केवळ ३,००० मीटर दृश्यमानतेतच वैमानिकांनी लँडिंगचा प्रयत्न केल्याचे विमान अपघात तपास विभागाच्या (AAIB) अहवालात नमूद करण्यात आले आहे. नेमके काय घडले? २८ जानेवारी रोजी सकाळी मुंबईहून निघालेले व्हीएसआर एव्हिएशनचे लिअरजेट ४५एक्सआर हे विमान बारामती विमानतळावर उतरण्याचा प्रयत्न करत होते. पहिल्या प्रयत्नात वैमानिकांना जमीन दिसली पण धावपट्टी दिसली नाही, त्यामुळे त्यांनी ‘गो-अराउंड’ केले. दुसऱ्या प्रयत्नात सकाळी ८ वाजून ४३ मिनिटांनी वैमानिकांनी धावपट्टी दिसत असल्याचे कळवले. सोळा सेकंदांनी नियंत्रण कक्षाने लँडिंगची परवानगी दिली. त्यानंतर अवघ्या चौदा सेकंदांत वैमानिकांनी “Oh St… Oh St…” असा शेवटचा संदेश दिला आणि विमान झाडांवर आदळले. यात दोन वैमानिक, एक केबिन अटेंडंट आणि दोन प्रवाशांसह सर्व पाच जण ठार झाले. बारामतीत हवामान मोजण्याची यंत्रणाच नाही – अहवालात उघड झालेली सर्वात धक्कादायक बाब म्हणजे बारामती विमानतळावर हवामान मोजण्याची कोणतीही अधिकृत यंत्रणा नाही. दृश्यमानतेचा अंदाज एका जमिनीवरील प्रशिक्षकाने हाताने काढलेल्या नकाशाच्या आधारे लावला होता. पाण्याची टाकी, पोलीस मुख्यालय आणि टोल नाका यांसारख्या खुणा वापरून हा अंदाज काढला गेला आणि तो वैमानिकांना कळवण्यात आला. INSAT-3DR उपग्रहाच्या छायाचित्रांमध्ये त्यावेळी बारामतीवर “अत्यंत विरळ धुके” दिसत होते. जवळच्या पुणे विमानतळावर त्याच वेळी दृश्यमानता केवळ २,००० मीटर होती. नियंत्रण कक्षाने प्रश्न का विचारला नाही? अहवालात नमूद करण्यात आले आहे की नियंत्रण कक्षाने दृश्यमानता निकषाखाली असतानाही लँडिंगची परवानगी दिली आणि वैमानिकांना याबाबत कोणताही प्रश्न विचारला नाही. हे गंभीर प्रणालीगत दोष असल्याचे अहवालात स्पष्टपणे म्हटले आहे. AAIB च्या तातडीच्या शिफारशी – AAIB ने डीजीसीएला तातडीच्या शिफारशी केल्या आहेत. कायमस्वरूपी हवाई वाहतूक नियंत्रण सुविधा नसलेल्या विमानतळांवर उड्डाण करणाऱ्या सर्व कंपन्यांनी मानक कार्यपद्धतींचे काटेकोरपणे पालन करावे आणि हवामान निकष पूर्ण होत नसताना कोणत्याही विमानाला उतरण्याची परवानगी देऊ नये, असे निर्देश द्यावेत असे सुचवले आहे. तपास अद्याप सुरू असून फ्लाइट डेटा रेकॉर्डरचे विश्लेषण चालू आहे. आगीत खराब झालेला कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर डेटा पुनर्प्राप्त करण्यासाठी अमेरिकेतील नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्डाकडे पाठवण्यात येणार आहे. हेही वाचा – सुनेत्रा पवारांकडे असलेल्या तिन्ही खात्यांची जबाबदारी ‘या’ दिग्गज मंत्र्यांकडे; अधिवेशनात जबाबदारीत बदल अपघातानंतरच्या ३० दिवसांत काय घडले? अजित पवार यांच्या निधनानंतर राजकीय, प्रशासकीय आणि कायदेशीर अशा तिन्ही आघाड्यांवर एकाच वेळी मोठे बदल घडले. राज्यात तीन दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर झाला. ३१ जानेवारी रोजी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेत राज्याच्या इतिहासात पहिल्या महिला उपमुख्यमंत्री होण्याचा मान मिळवला. अजितदादांकडील अर्थ आणि नियोजन खाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःकडे घेतले. २६ फेब्रुवारी रोजी वरळी येथील अधिवेशनात सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. पार्थ पवार यांची राज्यसभेसाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली. हेही वाचा – “सावध राहा, घराबाहेर पडू नका”; इस्रायलमधील भारतीयांना दूतावासाचा इशारा तपासाचे काय? सीआयडी तपासात घातपात, गुन्हेगारी कट किंवा निष्काळजीपणा या सर्व शक्यता तपासल्या जात आहेत. राज्य सरकारने केंद्राकडे सीबीआय तपासाची विनंतीही केली आहे. व्हीएसआर या विमान कंपनीच्या उड्डाणांवर बंदी घालण्यात आली असून सर्व खाजगी चार्टर कंपन्यांचे अनिवार्य सुरक्षा ऑडिट सुरू करण्यात आले आहे. अजितदादांच्या निधनाच्या दिवशी ७५ संस्थांना अल्पसंख्याक दर्जा देण्याच्या वादग्रस्त निर्णयावर मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली असून चौकशीचे आदेश दिले आहेत. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शोकप्रस्ताव मांडताना मुख्यमंत्री फडणवीस भावूक झाले. “अजितदादा हे महाराष्ट्राला कधीच न लाभलेले सर्वोत्तम मुख्यमंत्री होते,” असे गौरवोद्गार त्यांनी काढले. बारामतीमध्ये अजित पवार यांचे कायमस्वरूपी स्मारक आणि पुतळा उभारण्याचीही घोषणा राज्य सरकारने केली आहे.