विविध सामाजिक चळवळींत अग्रेसर असलेले आणि विशेषत: राजकीय भाष्य करण्याबद्दल प्रसिद्ध असलेले डॉ. बाबा आढाव दि.1 जून 2019 रोजी 90 व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. त्यानिमित्त बापूराव विरूळे यांनी लिहिलेला हा लेख.
1953 सालापासून डॉ. बाबा आढाव यांनी सामाजिक चळवळीत भाग घेतला. 1970 पर्यंत ते समाजवादी पक्षाबरोबर राहिले. भारतातल्या समाजवादी चळवळीने कामगार संघटनांची काही प्रमाणात उभारणी केली असली, तरी वैशिष्ट्यपूर्ण भांडवली विकासाच्या संदर्भात वर्गीय संबंधाविषयी कोणती मांडणी करता येईल, याकडे फारसे लक्ष दिले नाही. 1970 नंतर मात्र पक्षीय राजकारणापासून फारकत घेऊन त्यांनी जाणीवपूर्वक एक अराजकीय-राजकीय स्वरुपाची भूमिका स्वीकारली.बाबांनी आंदोलनामधून समाजवादी राजकारणाचा ठोस विरोध करणारे आणि जाती प्रश्नांवर निश्चित स्वरुपाचे प्रबोधन करणारी भूमिका स्थानिक राजकारणात मांडली. पुण्यात शहरकेंद्री भांडवली विकासाचे विषय स्वरुपाचे जे प्रारूप विकसित होऊ पाहत होते. त्याला आव्हान देणारे पर्यायी राजकीय सत्ताकेंद्र बाबांनी विविध संघटनांच्या रूपाने निर्माण केले.
स्वतंत्र भारतात गरीब, कष्टकरी, अंगमेहनती, स्वयं-रोजगारी समूहांना माणूसपणाचं जिणं मिळवून देणाऱ्या यशस्वी प्रयत्नांमध्ये डॉ. बाबा आढाव यांचे कार्य निर्विवादपणे अव्वल दर्जाचे आहेत. नडलेल्या, नाकारलेल्या उपेक्षित घटकांपर्यंत स्वातंत्र्याचे नि सार्वभौम लाभ पोहोचविण्याचे त्यांचं काम पथदर्शक आहे. संघर्ष आणि प्रबोधन या दुहेरी मार्गांनी बाबांनी आपले काम चालवलेले आहे.
हमाल पंचायत, रिक्षा पंचायत, मोलकरीण पंचायत, पथारी व्यावसायिक पंचायत, कागद-काच- पत्रा कष्टकरी पंचायत, बांधकाम कामगार पंचायत, टेम्पो पंचायत अशा अनेक संघटनांमधून शहरी भागात असंरक्षित कामगारांच्या संघटना-बांधणीचे प्रारूप बाबा आढाव यांच्या नेतृत्वाखाली साकार झाले आहे. महाराष्ट्रातल्या इतर अनेक सामाजिक चळवळीमध्ये गेली 50 वर्षे त्यांचा सहभाग आहे. डॉ. बाबा आढावांच्या विचारावर महात्मा फुले यांच्या कार्याचा प्रभाव आहे.
बाबा आढावांच्या नेतृत्वाचे सर्वांत महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांना असणारे राजकीय व्यवहार्यतेचे भान, असंघटित कामगारांचे संघटन घडवताना शोषणाच्या सर्व प्रक्रियांशी कमी अधिक प्रमाणात लढत राहणे, असंघटितांचे राजकारण घडवताना देखील केवळ शासन संस्थेशी आर्थिक मागण्यांविषयी संघर्ष न करता स्वायत्तपणे सहकारी संस्थांमधून सामाजिक सुरक्षितता मिळविण्याचे प्रयत्न करणे आणि राजकीय प्रबोधन घडवणे. संशोधन संस्थांचे साहाय्य घेऊही संघर्षात्मक राजकारणाचे प्राधान्य कायम ठेवणे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे पक्षीय राजकारणात सहभागी न होता देखील कलीच्या मुद्यावर राजकीय भूमिका घेण्याचे धाडस दाखवणे अशा सर्व पातळ्यांवर बाबांमधील राजकीय व्यवहार्यतेचे भान स्पष्ट होत जाते. संघर्ष आणि प्रबोधन अशा दुहेरी मार्गांनी झालेली त्यांच्या नेतृत्वाची वाटचाल हा महाराष्ट्राच्या पुरोगामी राजकारणातला एक महत्वाचा दस्तावेज आहे.