योगेश मिश्र
प्लॅस्टिक मुक्तीची सध्या देशभरात चर्चा आहे. पण केवळ घोषणा देऊन चालणार नाही तर दररोजच्या कामकाजातही त्याची अंमलबजावणी व्हायला हवी. प्रत्येक नागरिकांना पुढाकार घेऊन प्लॅस्टिकला नाही म्हणायचे शिकायला हवे. कोणतीही गोष्ट स्वीकारताना किंवा अंगीकारताना त्यापासून होणारा लाभ किंवा नुकसान याचा विचार करायला हवा.
महात्मा गांधी यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त केंद्र सरकारने “क्विट पॉलिथिन’ सारखे अभियान हाती घेऊन प्लॅस्टिकच्या विरोधात व्यापक मोहीम उघडण्याची तयारी केली आहे. देशातून कॅरिबॅगचे उच्चाटन करणे किंवा प्लॅस्टिकला नाही म्हणणे हे सरकारच्या निर्णयाची पुढची पायरी मानावी लागेल.
विसाव्या शतकाच्या प्रारंभी पहिल्या तीन दशकातच पॉलिथिनने प्रसिद्धी मिळवली होती. लियो बॅकलॅंडने फिनॉल आणि फॉर्मल डिहाइड नावाच्या रसायनाचा उपयोग करत कमी खर्चाचे कृत्रिम रेशीम तयार केले. हेच रेशीम पुढे पॉलिथिन नावाने प्रचलित झाले. त्याच्या शोधकर्त्याच्या आधारावरच त्यास बॅकलाइट असे म्हटले आहे. बेल्जियमचे रहिवासी लियो बॅकलॅंड हे गरीब कुटुंबातून आले होते. 1924 रोजी टाइम मासिकावर शोधकर्त्याचा फोटो प्रकाशित केल्यानंतरच पॉलिथिनची लोकप्रियता वाढली. ही वस्तू जळणारही नाही, वितळणारही नाही असा उल्लेख मासिकात करण्यात आला होता. त्यामुळे प्लॅस्टिकचा प्रसार आणि प्रचार वाढला. बॅकलॅंडच्या यशानंतर जगभरात प्रयोगशाळेतून प्लॅस्टिकचे वेगवेगळे रूप समोर येऊ लागले. पाहता पाहता पॉलिथिन हे मानवी आयुष्याचा अविभाज्य घटक बनले. पृथ्वीवर प्लॅस्टिकचे वय केवळ 112 वर्षे आहे. मात्र एवढ्या कमी कालावधीतही पॉलिथिनने जगभरात हाहा:कार माजवला आहे.
जगभरातील एकूण प्लॅस्टिकचा 34 टक्के भाग हा पॉलिथिनचा असतो. जगात 1950 पासून आतापर्यंत 9 अब्ज टन प्लॅस्टिकची निर्मिती झाली आहे. हे उत्पादन चार-चार एव्हरेस्ट शिखराएवढे आहे. 2011 रोजी सुजेन फ्रॅन्क यांनी पुस्तक “ए टॉक्सिक लव्ह स्टोरी’ यात म्हटले की, आपण दररोज प्लॅस्टिकपासून तयार केलेल्या सरासरी 196 वस्तूंचा वापर करतो. त्यापैकी 102 वस्तू या प्लॅस्टिकच्या नाहीत. सेल्यूलोस, कोळसा, नैसर्गिक गॅस, मीठ, कच्चे तेल यासारख्या नैसर्गिक उत्पादनापासून प्लॅस्टिकची निर्मिती केली जाते. प्लॅस्टिकला पॉलिमर म्हटले जाते. आपण संपूर्ण तेलाच्या एकूण उत्पादनापैकी 8 टक्के वाटा प्लॅस्टिक उत्पादनासाठी वापरतो. यावरून जगभरातील प्लॅस्टिक निर्मितीचा भस्मासूर आपल्याला लक्षात येईल.
आजच्या काळात प्लॅस्टिकसारखे दुसरे विष नाही. मानवनिर्मित तयार होणारी ही वस्तू माऊंट एव्हरेस्टपासून समुद्रकिनाऱ्यांपर्यंत प्रत्येक पातळीवर मिळते. समुद्रकिनारे, नदी, नाले, शेती, जमीन सर्वच ठिकाणी प्लॅस्टिकचे तुकडे पडलेले दिसून येतात. प्लॅस्टिकमुळे नाले बंद होतात, पृथ्वीतील क्षार कमी होते, पाणी दूषित होते, रंगीत प्लॅस्टिक बॅगने कर्करोगासारखे असाध्य आजार होतात. लाखो गायींचा प्लॅस्टिकच्या सेवनाने मृत्यू होतो. बाटलीबंद पाण्यात 6.5-100 मायक्रॉनपर्यंत 314 कण आढळून येतात. तर शंभर मायक्रॉनपासून मोठ्या बाटलीत प्रति लिटर दहा कण आढळून येतात. बाटलीबंद पाण्यात मायक्रो बीटस नावाचे अत्यंत सुक्ष्म कण देखील आढळून येतात. अमेरिकेत या बीटसवर 2015 पासून बंदी आहे. फ्रान्समध्ये प्लॅस्टिकवर बंदी आहे. रवांडा हे 2008 पासून प्लॅस्टिकमुक्त आहे. आयर्लंडने जबर करआकारणी केली असून तेथे पॉलिथिनचा वापर 94 टक्क्यांनी कमी झाला आहे. असे असतानाही भारतीय नागरिक दरवर्षी 11 किलो प्लॅस्टिकचा वापर करताना दिसून येतो.
प्लॅस्टिकचा कचरा आपल्यासाठी गंभीर समस्या बनली आहे. भारतात दररोज 26 हजार टन कचरा काढला जातो. त्यापैकी 94 टक्के कचऱ्यांचा पुनर्वापर करता येऊ शकतो. मात्र आपल्याकडे 60 टक्केच प्लॅस्टिकचे रिसायकल होते. या कचऱ्याने शहरी जीवन गुदमरले आहे. कोणत्याही शहरात प्लॅस्टिकचे प्रमाण हे आपल्याला पावसाळ्यात लक्षात येते. प्रत्येक शहरातील सांडपाणी व्यवस्थेला प्लॅस्टिकने सुरूंग लावले आहे. जगभरातील दहा प्रमुख नद्यांतून 90 टक्के प्लॅस्टिक समुद्रात पोहोचवले जाते. ब्रह्मपुत्रा, गंगा यासारख्या नद्यांतून 72,854 टन प्लॅस्टिक समुद्रात मिसळते. समुद्रात जाणाऱ्या प्लॅस्टिकमुळे होणाऱ्या प्रदूषणामुळे दरवर्षी दहा लाख समुद्रपक्षी आणि एक लाख स्तनधारी जीवांचा मृत्यू होतो.
भारत सरकारने 2022 पर्यंत देशातून प्लॅस्टिकचे उच्चाटन करण्याचा संकल्प केला आहे. यासाठी पंतप्रधान मोदी यांना संयुक्त राष्ट्राच्या पर्यावरणसंबंधी सर्वोच्च पुरस्कार यूएनइपी चॅम्पियन्स ऑफ द अर्थने देखील गौरविले आहे. महाराष्ट्रातही कॅरिबॅग मुक्ततेला मोठ्या प्रमाणात चालना देण्यात आली आहे. मात्र, केवळ संकल्प करून प्लॅस्टिकपासून आपली मुक्तता होणार नाही. यापूर्वी भारतात अनेक मोहिमा फसल्या आहेत. या अभियानाची दशा, दिशा आणि गती यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. सध्या पॉलिथिनमध्ये मिळणारे दूध पूर्वी बाटलीत मिळायचे. दररोज बाटली जमा करून दूध आणावे लागत होते. किराणा दुकानातील सामान हे कागदाच्या पुड्यात आणले जात होते. या पुड्या मजबूत असायच्या. भाजीपाला विकत असताना कापडी पिशवी बाळगली जात असे. सायकलीस टोपली, पिशवी अडकवून भाजीपाला घरी आणला जात असे. तसेच मोटारसायकलच्या बाजूला साइड बॉक्स असायचे. पाकीट, बाटली आणि पिशव्यांमुळे रोजगार मिळाला होता. प्रदूषणाचे प्रमाण मर्यादित होते. तेव्हा लोकसंख्याही कमी होती. आज मात्र सर्वच गोष्टी हाताबाहेर गेल्या आहेत. आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे. शुद्ध पाणी, हवा आणि धान्याची कमतरता आहे. आजारापासून वाचण्यासाठी रोगप्रतिकारकशक्ती वाढविणेही गरजेचे आहे.
एकीकडे सुविधा पाहात असताना दुसरीकडे नैसर्गिक समतोल तर बिघडत नाही ना, याचीही काळजी घ्यायला हवी. आपण एखादी गोष्ट मान्य करताना समाजाला कशी आणि किती किंमत मोजावी लागेल, याचाही विचार करायला हवा. प्लॅस्टिकमुक्तीपासून नागरिक लांब जाऊ नयेत, याचीही खबरदारी घेणे आवश्यक आहे.