सातारा -करोनाला रोखण्यासाठी सर्वत्र लॉकडाऊन असताना शाहूपुरी व परिसरात मात्र वीज आणि पाण्याही लॉकडाऊन झाल्याचा अनुभव लोकांना येत आहे. सोमवारी सकाळी दहा वाजल्यापासून गायब झालेली वीज सायंकाळी सहा वाजून 40 मिनिटांनी आली. सुमारे आठ तासांहून अधिक काळ वीजपुरवठा खंडित होता. वीज नाही, पाणीपुरवठाही नाही त्यामुळे परिसरातील नागरिकांची परवड झाली. वाढता उकाडा त्यात वीज गायब झाल्याने नागरिकांचे हाल झाले. वीजवितरणच्या कारभाराबाबत लोकांनी तीव्र संताप व्यक्त केला.
लॉकडाऊनमुळे अत्यावश्यक सेवेसाठी ठराविक वेळेत नागरिकांना सोशल डिस्टन्स पाळत बाहेर पडता येत आहे. त्यामुळे जास्तीत जास्त वेळ नागरिक घरातच थांबत आहेत. त्यामुळे वीज, पाणी, इंटरनेटचा वापर वाढला आहे. या सुविधा नागरिकांना तत्परतेने मिळाव्यात, अशा सूचना प्रशासनाच्यावतीने करण्यात आल्या आहेत. शाहूपुरी व परिसरात मात्र या सूचनांची अंमलबजावणी होताना दिसत नाही. सतत होणारा विजेचा लपंडाव, विस्कळित पाणीपुरवठा हे नित्याचेच बनले आहे. निदान आपत्तीजनक स्थिती असताना तरी संबंधित विभागांनी योग्य खबरदारी घेणे गरजेचे आहे. मात्र, नियोजनाचा अभाव असल्याने शाहूपुरी व परिसरातील नागरिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
शाहूपुरी व परिसरातील वीज सोमवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास गायब झाली. त्यानंतर महावितरणच्या कार्यालयात संपर्क साधला असता विद्युत वाहिनीत बिघाड आहे, काम सुरू आहे अर्ध्या तासात वीज येईल, असे उत्तर दिले जात होते. मात्र, सायंकाळपर्यंत वीज आली नव्हती. याबाबत महावितरणच्या बारामती येथील कार्यालयाशी संपर्क साधला असता विद्युत वाहिनीमध्ये बिघाड झाला असून दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर असल्याचे सांगण्यात येत होते.
सुमारे आठ तासांहून अधिक काळ वीज गायब झाल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. दिवसेंदिवस उन्हाळ्याची तीव्रता जाणवत आहे. त्यातच लॉकडाऊन असल्याने नागरिकांना घराबाहेरही पडता येत नाही. त्यामुळे वीज असणे गरजेचे आहे. मात्र, वीज गायब झाल्याने लहान मुले, ज्येष्ठ नागरिक यांना त्रास सहन करावा लागला. सायंकाळी सहा वाजून 40 मिनिटांनी विद्युतपुरवठा सुरळीत झाला.
पाणीपुरवठ्याबाबतही संताप
शाहूपुरी व परिसरात सोमवारी दिवसभर विद्युतपुरवठा बंद असल्याने पाणीपुरवठा विस्कळीत झाला. रविवारी पण काही भागात पाणी आले नव्हते. मंगळवारी शाहूपुरीत पाणीपुरवठा बंद असतो. त्यामुळे पाणीपुरवठ्याच्या विस्कळीतपणाचा फटका नागरिकांना बसत आहे.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कारभाराबाबत शाहूपुरीकरांनी अनेकदा तीव्र नाराजी व्यक्त केलेली असतानाही नियोजनाअभावी नागरिकांना पाण्यापासून वंचित राहवे लागत आहे. लॉकडाऊन असल्याने संपूर्ण कुटुंबीय घरातच असल्याने पाणी वापरण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यातच कमी दाबाने पाणीपुरवठा होणे, पाणीपुरवठा खंडित होणे असे प्रकार होत असल्याने नागरिक संताप व्यक्त करत आहेत. कारभारात सुधारणा व्हावी, अशी मागणी शाहूपुरीकरांमधून होत आहे.