भवानीपाटणा – केंद्र सरकारने विविधयोजनांच्या माध्यमातून ओडिशात विकास घडवून आणण्याचा प्रयत्न केला पण येथील बीजू जनता दलाच्या सरकारने आम्हाला सहर्काय केले नाही. पण चौकीदाराने केंद्रीय योजनांच्या मदतीने या राज्यात बदल घडवून आणण्याचा प्रयत्न केला असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज येथे एका जाहीर सभेत बोलताना केला.
राज्यात भाजपचे सरकार स्थापन झाले असते तर या राज्याचा वेगाने विकास झाला असता असे ते म्हणाले.
या राज्यात विधानसभेच्याही निवडणुका होत असून लोकांनी भाजपला येथे सत्ता दिली तर केंद्रातील सत्ता आणि राज्यातील सत्ता यांचे हे डबल इंजिन ओडिशाच्या विकासासाठी कार्यरत राहील असे ते म्हणाले. आमच्या सरकारने आठ लाख कुटुंबांसाठी पक्के घर बांधून दिले असून 24 लाख घरांमध्ये वीज पोहचवली आहे. चाळीस लाख कुटुंबांना आम्ही गॅस कनेक्शन दिले आहे असे ते म्हणाले.
गेल्या पाच वर्षात आम्ही या राज्यांमध्ये 1 कोटी 40 लाख लोकांची बॅंकांमध्ये खाती उघडून 50 लाख घरांमध्ये शौचालये निर्माण केली आहेत अशी माहितीही त्यांनी दिली. कॉंग्रेसने या राज्यातील जनतेची मोठीच फसवणूक केल्याचा आरोपही त्यांनी केला. कॉंग्रेसच्या गैरकारभारामुळेच या राज्यातील अनेकांना दुसऱ्या राज्यांमध्ये विस्थापित व्हावे लागले आहे असे ते म्हणाले.