मुंबई : राज्यात दिवसेंदिवस करोनाबाधितांच्या आकडयात झपाट्याने वाढ होत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे राज्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, मुंबईसह राज्यात बुधवारी रुग्णसंख्येत मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळाली.
राज्यात दिवसभरात करोनाचे ८,८०७ नवे रुग्ण आढळले. त्यात मुंबईतील १,१६७ जणांचा समावेश आहे. त्यामुळे मुंबईवर पुन्हा एकदा कोरोनाचे संकट घोंघावत असल्याचे दिसत आहे.
गेल्या आठवडय़ात नागपूर आणि अमरावती या दोन जिल्ह्य़ांमध्ये रुग्ण वाढले होते. गेल्या २४ तासांत मुंबई, ठाणे, पुणे, औरंगाबाद, नगर, जळगाव, नागपूर, अमरावती या जिल्ह्य़ांमध्ये रुग्णसंख्या वाढली आहे. मंगळवारच्या तुलनेत बुधवारी रुग्णसंख्येत अडीच हजारांनी वाढ झाली आहे.
गेले दोन दिवस मुंबईतील रुग्णसंख्येत घसरण नोंदविण्यात आली होती. मात्र, बुधवारी तब्बल १,१६७ मुंबईकरांना करोनाची बाधा झाल्याची नोंद होताच यंत्रणांचे धाबे दणाणले. करोना वाढीचा दर ०.२४ टक्क्य़ांवर पोहोचल्याने चिंता व्यक्त होत आहे. रुग्णसंख्या आणखी दोन-तीन दिवस अशीच वाढल्यास राज्य सरकारला कठोर निर्बंध लागू करण्यासाठी पावले उचलावी लागतील, असाच सूर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी उमटला.