नगर – जिल्हा रुग्णालयातील करोना टेस्ट लॅबमध्ये आज 23 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यामध्ये नगर शहरातील 15, श्रीगोंदा येथील सात आणि पारनेर तालुक्यातील एका रुग्णाचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यात उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या आता 315 इतकी असून, एकूण बाधितांची संख्या 986 झाली आहे. बरे झालेल्या रुग्णांची संख्या 649 इतकी आहे.
आज बाधित आढळलेल्या रुग्णांमध्ये पारनेर तालुक्यातील भाळवणी येथील एक, श्रीगोंदा येथील झेंडा चौक येथील पाच, तसेच श्रीगोंदा शहरातील आणि तालुक्यातील वडळी येथील एक जण बाधित आढळून आला. नगर शहरात गवळीवाडा येथील नऊ, चितळे रोड, झेंडीगेट एक आणि शहराच्या मध्यवस्तीत चार जण बाधित आढळून आले आहेत, अशी माहिती नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाडे यांनी दिली.
दरम्यान, जिल्ह्यात आज 15 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. करोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या आता 649 झाली आहे. त्यामध्ये नगर शहर सात, श्रीरामपूर सात, राहाता, श्रीगोंदा आणि जामखेड येथील प्रत्येकी एक, असे 15 जण बरे झाले. तसेच आज आखेर 22 व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. नगर शहरासह जिल्ह्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, दिवसागणिक बाधितांमध्ये वाढ होत आहे.
त्यामुळे जिल्ह्याच्या आकड्याने हजारी ओलांडली आहे. त्यामुळे नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे. आज सकाळी आलेल्या अहवालात 23 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तसेच सायंकाळच्या अहवालाची नगरकरांना प्रतीक्षा आहे.
मनपा कर्मचाऱ्यांचा काम करण्यास विरोध
मनपा मुख्यालयात करोनाने शिरकाव केल्याने मनपा वर्तुळात खळबळ उडाली आहे. मुख्यालयातील एक अधिकारी व तीन कर्मचारी करोनाबाधित आढळून आले आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, आज सकाळी कर्मचारी युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी मनपा आयुक्तांची भेट घेऊन मुख्यालयात काम करण्यास नकार देत दुसऱ्या इमारतीत व्यवस्था करण्याची मागणी केली आहे.
भिस्तबाग परिसर कन्टेन्मेंट झोन
करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने भिस्तबाग परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केला आहे. यात अयोध्यानगर, कौशलघर, सुपर क्लिनर्स, उत्तरेकडील ओढा, शेंदूरकर घर, पिंपरकर घर, मचे घर, कौशलघर हे क्षेत्र कन्टेन्मेंट झोन घोषित केला आहे.
तर पूर्वेकडील कौशल्यानगरी, गजानन कॉलनी, संगीतनगर, दक्षिणेकडील सिमला कॉलनी, उत्तरेकडे किसनगिरी बाबानगर हे क्षेत्र बफर झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. 13 जुलै दुपारी दोन वाजल्यापासून 26 जुलै रात्री 12 वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापना, दुकाने, अत्यावश्यक सेवा, वस्तू विक्री बंद राहणार आहे.