Radhakrishna Vikhe Patil : पुन्हा आंदोलन करण्याची वेळ येणार नाही; जरांगेंच्या इशाऱ्यानंतर राधाकृष्ण विखे पाटलांची पहिली प्रतिक्रिया
Radhakrishna Vikhe Patil : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर घेतलेली भूमिका अभूतपूर्व असल्याचे सांगत, सरकार या विषयावर पूर्णपणे सकारात्मक आहे.

Radhakrishna Vikhe Patil : मराठा आरक्षण आंदोलनाचे प्नणेते मनोज जरांगे यांनी २८ ऑगस्टपर्यंत प्रलंबित मागण्या पूर्ण न झाल्यास २९ ऑगस्टपासून पुन्हा आंदोलन छेडण्याचा इशारा राज्य सरकारला दिला आहे. यानंतर यावर मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रकार परिषद घेत पहिली प्रतिक्रिया दिली असून एक मोठं वक्तव्य केलं आहे.
सरकार मराठा समाजाच्या मागण्यांबाबत सकारात्मक असून, जरांगे यांना लवकरच सविस्तर अहवाल पाठविण्यात येणार असल्याचे राधा कृष्ण विखे पाटील यांनी सांगितले. “शासनाने आतापर्यंत केलेल्या उपाययोजनांमुळे मनोज जरांगे यांच्यावर पुन्हा आंदोलन करण्याची वेळ येणार नाही”, असं मोठं वक्तव्य विखे पाटलांनी केलं.
राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, “शासनाने आतापर्यंत केलेल्या उपाययोजनांमुळे मनोज जरांगे यांच्यावर पुन्हा आंदोलन करण्याची वेळ येणार नाही. मराठा समाजाच्या हितासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले असून त्यांची प्रभावी अंमलबजावणीही सुरू आहे. शिंदे समितीमार्फत तब्बल ५८ लाख नोंदी शोधण्याचे काम करण्यात आले असून ते अद्याप सुरू आहे.”
विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना, आंदोलनादरम्यान मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना नोकरी, बंद झालेल्या योजनांचे पुनरुज्जीवन, वैधता प्रमाणपत्र मुदतवाढ आणि सारथी संस्थेतील जागांमध्ये वाढ अशा अनेक उपाययोजना करण्यात आल्याचा पुर्नउच्चार पत्रकार परिषदेत बोलताना राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला.
हैदराबाद गॅझेटच्या अंमलबजावणीसंदर्भात सातत्याने आढावा घेतला जात असून कोणत्याही पात्र लाभार्थ्याला अडचण येऊ नये, यासाठी प्रशासनाला स्पष्ट सूचना देण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी बोलताना विखे पाटील यांनी शिंदे समितीला २०२७ पर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती दिली.
शासन निर्णयांच्या अंमलबजावणीत कुठेही कमी पडले नसून, काही त्रुटी असल्यास त्या दूर केल्या जातील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर घेतलेली भूमिका अभूतपूर्व असल्याचे सांगत, सरकार या विषयावर पूर्णपणे सकारात्मक आहे.
लवकरच त्यांचे समाधान होईल: राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil)
ओबीसी समाज किंवा त्यांच्या नेत्यांचा सरकारवर कोणताही दबाव नाही. जरांगे यांनी मांडलेल्या मागण्यांवर मुख्यमंत्री फडणवीस यांनीच निर्णय घेतले असून, सरकार त्याबाबत कटिबद्ध आहे. लवकरच त्यांना सविस्तर अहवाल पाठवण्यात येईल आणि त्यांचे समाधान होईल, असा विश्वास राधाकृष्ण विखे पाटलांनी व्यक्त केला.





