नवी दिल्ली – केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सोमवारी मध्य प्रदेश आणि राजस्थान या दोन राज्यांत झालेल्या वेगवेगळ्या सभांमध्ये विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीवर जोरदार टीकास्त्र सोडले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान पदावरून हटविण्यासाठी 28 पक्ष एकत्र आले आहेत. मोदी यांना हटवणे हाच त्यांचा उद्देश असून त्यांचे केवळ नावच मोठे आहे.
आम्हीही एकदा इंडिया शायनिंगचा नारा दिला होता. त्यावेळी निवडणुकीत आमचा पराभव झाला. आता यांनीही इंडिया असेच नाव ठेवले असल्यामुळे विरोधकांचा पराभव निश्चित आहे असा दावा राजनाथ सिंह यांनी केला.
2004 मध्ये तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी निवडणुकीच्या रिंगणात उतरली होती. त्यावेळी या पक्षाने इंडिया शायनिंगचा नारा दिला होता. मात्र भाजपला पराभवाला सामोरे जावे लागले होते आणि पक्षाला केंद्रातील सत्तेतून पायउतार व्हावे लागले होते. त्याचाच संदर्भ आता राजनाथ सिंह यांनी दिला. दरम्यान, आपल्या प्रचारसभांमध्ये राजनाथ यांनी कॉंग्रेसवरही टीका केली. त्यांनी कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.