– वाहनाविना केंद्रे धूळखात; शहरासाठी एकच वाहन, तर दुसरे वाहन नादुरुस्त
– लोकसंख्यांच्या तुलनेत 5 केंद्रे आवश्यक
– कर्मचीरी संख्या अपुरी
– टेक्निकलच्या 6 कर्मचाऱ्यांवर मदार
– नगरसेवकांचेही झाले दुर्लक्ष
रवींद्र कदम
नगर – दिवसेंदिवस वाढत्या उन्हामुळे आगीचा धोकाही वाढला आहे. एका बाजूला शहरीकरण वाढत असून, त्या तुलनेत अग्निशमन विभागातील मनुष्यबळ मात्र वाढण्याऐवजी कमी होत आहे. महापालिकेच्या अग्निशमन विभागात अवघे 29 कर्मचारी काम करीत आहे. नगर शहरासह सावेडी, केडगाव या उपनगरांचा विस्तार वाढत असल्यामुळे अग्निशमन विभागाने माळीवाडा, सावेडी यानंतर केडगाव येथेही आपले केंद्र सुरू केले होते. परंतु, अपुऱ्या मनुष्यबळामुळे हे केंद्र वाहनाविनाच धूळखात पडून आहेत.
कर्मचाऱ्यांचा अभाव, अपुरी यंत्रणा, यामुळे महापालिकेचा अग्निशमन विभागच धूळखात पडला आहे. या विभागाकडे असणाऱ्या प्रत्येकी चार हजार लिटरची दोन मोठी वाहने त्यापैकी गेल्या महिनाभरापासून एक गाडी नादुरुस्त झाली आहे. त्यामुळे चार लाख लोकसंख्येच्या नगर शहरासाठी चार हजार लिटरचा एकच अग्निशमन बंब राहिला असून या विभागास कात टाकण्याची गरज व्यक्त होत असून मनपाचा अग्निशमन विभागच रामभरोसे असल्याचे दिसत आहे.
नगर शहरासह सावेडी, केडगाव या उपनगरांचा विस्तार वाढत असल्यामुळे अग्निशमन विभागाने माळीवाडा, सावेडी यानंतर केडगाव येथेही आपले केंद्र सुरू केले होते. परंतु, अपुऱ्या मनुष्यबळामुळे दोन्ही केंद्र बंद आहे. त्यामुळे केवळ सावेडी परिसर हा टेलिफोन उचलण्यापुर्ताच राहिले असून त्या ठिकांणी वाहनांची गरज आहे. अपुऱ्या कर्मचाऱ्यांच्या समस्येला सामोरे जाणाऱ्या अग्निशमन विभागाला अपुऱ्या यंत्रणेचासुद्धा सामना करावा लागत आहे.
अग्निशमन विभागाचे प्रत्येकी चार हजार लिटरचे दोन अग्निशमन बंब आहेत. यापैकी एक बंब हा सावेडी येथील केंद्रात तर एक बंब माळीवाडा येथील केंद्रामध्ये असतो. परंतु, यामधील एक बंब गेल्या महिन्याभरापासून नादुरुस्त आहे. त्यामुळे सध्या माळीवाडा येथील केंद्रावर अग्निशमन विभागाचा बंब दिसतोय. याशिवाय या विभागाकडे दोन जीप असल्या तरी त्यांची क्षमता कमी आहे. यामध्ये प्रत्येकी अवघे 250 लिटर पाणी बसते. त्यामुळे मोठी आगीची दुर्घटना घडल्यास नागापूर एमआयडीसी तसेच नगर शहराच्या बाहेरीत इतर अग्निशमन विभागाची मदत घेण्याशिवाय महापालिकेच्या अग्निशमन विभागाकडे सध्या पर्याय राहिलेला नाही.
अग्निशमन विभागाकडे विद्यमान नगरसेवकांचे दुर्लक्ष झाले असून त्यांनी वाहनांबाबत पाठपुरावा केला पाहिजे असे नागरिकांमधून बोलले जात आहे.
शहराची सुरक्षा रामभरोसे
शहराची लोकसंख्या साडेतीन लाखांहून अधीक असून, नियमानुसार 50 हजार लोकसंख्येमागे एक मोठे अग्निशमन वाहनाची आवश्यकता आहे. त्यामुळे नगर शहरात नियमानुसार सात मोठी वाहने आवश्यक असून, प्रत्येक वाहनावर 21 कर्मचाऱ्यांची अवश्यकता आहे. त्यानुसार महापालिकेच्या अग्निशमन विभागात 147 कर्मचारी असावेत. मात्र, प्रत्यक्षात केवळ दोन मोठी व दोन छोटी वाहने असून, 30 कर्मचाऱ्यांवर महापालिका अग्निशमन विभागाचा डोलारा आहे. त्यातही अनेक कर्मचारी हे वेगवेगळ्या विभागाचे असून, त्यांना कुठलेही टेक्निकल कोर्सचे प्रशिक्षण दिले नसल्यचे समोर आले आहे. त्यामुळे शहराची सुरक्षा एक प्रकारे राम भरोसेच असल्याचे दिसत आहे.
अग्निशमन बंब भरण्यासाठी शहरात एकच ठिकाण
अग्निशमन वाहनात पाणी भरण्यासाठी सद्या शहरातील वसंत टेकडी येथे एकमेव ठिकाण आहे. केडगाव परिसरात अचानक आग लागल्यास अग्निशम वाहनाच्या क्षमतेनुसार ते वाहन एक तास आग विझवू शकते. मात्र त्यानंतर अग्निशमन वाहनास केडगाहून वसंत टेकडीवर येथे पाणी भरण्यासाठी जावे लागेल.तो पर्यंत आग लागल्याठिकान भस्मसात होईल त्यासाठी मनपाने पाण्याच्या टाक्याच्या ठिकांणी पाण्याचे पॉईट दिले पाहिजे असे ही नागरिकांमधून बोलले जात आहे.
कर्मचारी भरण्यासाठी निविदा ; मात्र, प्रतिसाद नाही
अग्निशमन विभागाचे काम हे तीन शिफ्टमध्ये चालते. एका शिफ्टमध्ये साधारण आठ ते दहा कर्मचारी असतात. त्यामुळे एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतर दुसऱ्या शिफ्टवर असणाऱ्या तसेच सुट्टीवर गेलेल्या कर्मचाऱ्यांनासुद्धा बोलावून घ्यावे लागते. शहराचा विस्तार पाहता या विभागाला जवळपास 60 प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. या विभागात कॉन्ट्रॅक्ट बेसवर कर्मचारी भरण्यासाठी निविदासुद्धा काढण्यात आली होती. परंतु, त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही.