कापूरहोळ -करोनाचा सर्वसामान्यांच्या जनजीवनावर विपरीत परिणाम झाला आहे. कापूरहोळ, नसरापूर, किकवी, सारोळा भागातील बाजारपेठा ओस पडल्या होत्या. त्यामुळे कोट्यवधी रुपयांची उलाढाल थांबली होती. लॉकडाऊन आणखी किती दिवस राहणार याची चिंता व्यावसायिक व्यक्त करीत होते. बाजाराकडे करोनाच्या प्रभावाने नागरिकांनी पाठ फिरवली होती. मात्र, आता परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत आहे.
पुणे शहरात करोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळल्याने पुणे शहरापासून अत्यंत जवळ असलेल्या नसरापूर बाजारपेठवर प्रभाव पडला होता. ग्रामीण भागातील पुणे, मुंबई शहरात राहणारे नागरिक आपल्या मूळ गावात आले आहेत. प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून किकवी, नसरापूर येथील आठवडे बाजार काही काळासाठी बंद ठेवले होते.
तालुक्यातील नागरिकांची आठवडे बाजाराच्या दिवशी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. या करिता आठवडे बाजार बंद ठेवण्यात आले आहेत. शासनाने लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात सूट दिल्यामुळे सकाळी 9 ते 2 या काळात दुकाने सुरू ठेवण्यासाठी सवलत दिल्याने नसरापूर, कापूरहोळ बाजारपेठ नागरिक गर्दी करू लागले आहेत.
ग्रामीण भागातही बाजारपेठांच्या ठिकाणी नागरिक तोंडाला मास्क लावून बाजारपेठेमध्ये आवश्यकता असल्यास येताना दिसत आहेत तसेच अनावश्यक प्रवास टाळला जात आहे. पुणे – सातारा महामार्गावरील वाहतूकही मंदावली आहे. सार्वजनिक, खासगी वाहतूक व्यवस्थेवर विपरीत परिणाम झाला आहे.
बाजारपेठेत ग्राहक नसल्यामुळे शेतीमालाच्या बाजारावर त्याचा विपरीत परिणाम झाला आहे. बाजारात शेतमालाला मागणी नसल्याने भाजीपाल्याचे भाव कमी होऊ लागले आहेत.
भोर तालुक्यातील सर्व मेडिकल्स, दवाखाने नियमित सुरू आहेत. नागरिकांना हॅन्ड सॅनिटायझर व मास्कचा तुटवडा निर्माण होऊ नये म्हणून संघटनेच्या वतीने काळजी घेण्यात येत आहे.
– राहुल देशपांडे,
सचिव, केमिस्ट असोसिएशन
तालुक्यातील ग्रामीण भागात करोनाचा मुकाबला करण्यासाठी प्रशासन सज्ज आहे. आरोग्य विभागाने विविध प्रकारच्या उपाययोजना केल्या आहेत. बाजारपेठेत गर्दी टाळण्यासाठी दुकानदार, व्यापारी यांना सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, वैयक्तिक स्वच्छता पाळावी, तोंडाला मास्क लावल्याशिवाय नागरिकांना बाजारात फिरता येणार नाही. मालखरेदी व विक्री करताना सॅनिटायझरचा वापर करावा, व्यापाऱ्यांनी दुकाने वेळेतच बंद करावी.
– अजित पाटील,
तहसीलदार, भोर.