पुणे -शहरात सोमवारी (दि.12) संत ज्ञानेश्वर महाराज आणि जगदगुरू तुकाराम महारांच्या पालखीचे आगमन होणार आहे. दरवर्षी प्रमाणे मार्केट यार्ड वारकऱ्यांच्या सेवेसाठी सज्ज झाले आहे. भुसार बाजरात तब्बल साडेसोळा
हजार वारकऱ्यांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती दि पूना मर्चंट्स चेंबरचे अध्यक्ष राजेंद्र बाठिया यांनी दिली. तर फळ-भाजीपाला विभागातही मोठ्या प्रमाणात वारकरी राहणार असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
सोमवारी शहरात आल्यानंतर पालख्यांचा मंगळवारी मुक्काम आहे. बुधवारी पालख्या पुढे प्रस्थान करणार आहेत. पालखीसोबत मोठ्या संख्येने वारकरी असतात. शहरातील विविध भागात हे वारकरी राहतात. मात्र, वारकऱ्यांचे सेवा करण्यास मार्केट यार्ड येथील व्यापारी पुढे असतात. यावर्षी विविध व्यापाऱ्यांकडे मिळून भुसार बाजारात तब्बल साडेसोळा हजार वारकरी राहणार आहेत. त्यांच्या जेवणाचीही व्यवस्था करण्यात येणार आहे.
दरवर्षी व्यापाऱ्यांकडून हा उपक्रम राबविला जातो. व्यापारी व्यापार बंद ठेवून वारकऱ्यांचे सेवा करत असतात. यंदाही हे करण्यात येणार आहे. भुसार विभागाप्रमाणेचे भाजी आणि फळ विभागात शेतकरी मोठ्या संख्येने येतात. त्यांची संख्या नक्की किती, हे सांगता येणार नाही. मात्र, मोठ्या संख्येने येथे वारकरी राहत असतात. त्याच्या खाण्याची-पिण्याची सोय अनेक वर्षांपासून केली जाते.
या दिवशी व्यापारी व्यापार बंद ठेवून वारकऱ्यांची सेवा करतात. मार्केट यार्डातील संपूर्ण वातावरण भक्तीमय बनत असते. वारकऱ्यांची सेवा करायला मिळते, हे आमच्यासाठी भाग्याचे आहे, असे फळ विभागातील व्यापारी युवराज काची यांनी सांगितले.