लोणंद -लोणंद कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारावरील कांदा व भुसार मालाची आवक दि. 17 मेपासून सुरू झाली तर 18 मेपासून कांदा व इतर शेतमालाचे लिलाव सुरू झाले होते. आता यापुढे येथील व्यवहार पूर्वीप्रमाणे आठवड्यातून दोन वेळा सुरू होणार असल्याची माहिती सभापती राजेंद्र तांबे व उपसभापती दत्तात्रय बिचुकले यांनी दिली.
लॉकडाऊनमुळे दोन महिने लिलाव बंद ठेवण्यात आले होते. कांदा तयार असला तरी बाजारपेठ नसल्याने बाजार समितीच्या आवारातील मार्केट कधी सुरू होणार, याची प्रतीक्षा शेतकऱ्यांना होती. या पार्श्वभूमीवर सभापती राजेंद्र तांबे, उपसभापती दत्तात्रय बिचुकले व संचालकांनी आडते, बाजार समितीतील व्यापाऱ्यांची बैठक घेऊन शासनाचे आदेश नियम पाळून बाजार सुरू करण्याबाबत चर्चा केली होती. बाजार समितीत सकाळी 9 ते सायंकाळी 5 पर्यंत आवक व दुसऱ्या दिवशी लिलाव करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला होता. या निर्णयाची अंमलबजावणी 17 मेपासून सुरू झाली होती.
आता शेतकऱ्यांचे होणारे नुकसान लक्षात घेऊन नेहमीप्रमाणेच दर रविवार-सोमवार आणि बुधवार- गुरुवार असा आठवड्यातून दोन वेळा बाजार सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी लॉकडाऊनमधील नियमांचे पालन करावे. आपला कांदा वाळवून, निवडून व प्रतवारी करून बाजार आवारात विक्रीस आणावा, असे आवाहन तांबे यांनी केले आहे.
खंडाळा व फलटण तालुक्यात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर कांदा पीक घेतले होते. तयार झालेल्या कांद्याला बाजारपेठ नसल्याने शेतकऱ्यांनी जागा मिळेल तिथे कांदा साठवला होता. शेतात झाडाखाली ठेवलेला कांदा उन्हाळी पावसाने भिजण्याची भीती होती. आता बाजार पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. आता नेहमीप्रमाणे लिलाव होणार असल्याने कांद्याचे दर किती निघणार, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. या संकटकाळात व्यापाऱ्यांनी दर पाडून पोटावर मारू नये, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.