आळंदी, दि. 24 (वार्ताहर) -इंद्रायणी नदीत पडलेल्या महिलेचे प्राण एनडीआरएफच्या पथकाने वाचवले असून सध्या संबंधित महिलेची प्रकृती स्थीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्यासाठी यावर्षी आळंदीत पाच लाखावर भाविक दाखल होते. बुधवारी (दि. 23) दुपारच्या वेळी 45 वर्षीय भाविक महिला इंद्रायणीत स्नान करित असताना भोवळ येऊन नदीत पडली. पोहता येत नसल्याने त्या पाण्यात बुडत होत्या. यावेळी इंद्रायणी घाटावर भाविकांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या आपत्ती व्यवस्थापन एन.डी.आर.एफ. पथकाचे जवानांनी तात्काळ महिलेला बाहेर काढून प्राथमिक उपचार केले. त्यानंतर पुढील उपचारासाठी आळंदी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या भाविक महिलेची प्रकृती स्थीर असल्याची माहिती, आळंदी ग्रामीण रुग्णालयाच्या अधिक्षक उर्मिला शिंदे यांनी दिली आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी अंकुश जाधव, अधिक्षक किशोर तरकासे, अग्निशमन विभाग प्रमुख अक्षय शिरगिरे, साधना शिंदे यांनी महिलेची रुग्णालयात भेट घेतली.