चिंबळी – भामा आसखेडच्या पुण्याला जाणाऱ्या जलवाहिनेचे काम गेल्या अनेक दिवसांपासून रखडले होते; मात्र आता ते पुन्हा सुरू करण्यात आले आहे. त्यात पाऊस सुरू असल्याने केळगाव-आळंदी रस्त्याची अक्षरश: चाळण झाली असून रस्ता चिखलात रुतला आहे. ओढ्यावर भला मोठा खड्डा पडला असून त्यात पाणी साचल्याने दिसत नसल्याने मोठ्या अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे.
केळगाव-आळंदी रस्त्यावर पुण्याला जाणाऱ्या जलवाहिनीचे काम गेल्या कित्येक दिवसांपासून मध्येच थांबते मध्येच सुरू होते. मात्र, त्या कामासाठी रस्ता खोदला जात असून त्याची डागडुजी व्यवस्थित केली जात नसल्याने स्थानिकांना त्याचा नाहक फटका बसत आहे. सध्या याला रस्ता म्हणायचे की पायवट, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे किमान जलवाहिनीचे काम पूर्ण होईपर्यंत तरी पर्यायी व्यवस्था उपलब्ध करावी, अशी मागणी जोर धरीत आहे.
केळगाव-आळंदी रस्त्यावर पाइपलाइनचे काम पुन्हा सुरू करण्यात आले असून या ठिकाणी काम सुरू असून रस्ता बंद आहे असा फलक कोठेही लावला नसल्याने येथे वाहतूककोंडी होत आहे. जर एखादा मोठा अपघात झाला तरच प्रशासनास जाग येणार का? असा सवाल स्थानिकांनी उपस्थित केला आहे.