नवी दिल्ली :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वकांक्षी प्रकल्पापैकी एक असलेल्या “वंदे भारत’ एक्स्प्रेसला प्रारंभीच्या टप्प्यात चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र, जादा तिकिट दरामुळे प्रवाशांनी या प्रवासाकडे हळूहळू पाठ फिरविल्याचे दिसून आले. याची दखल घेत “वंदे भारत’सह सर्व रेल्वेगाड्यांचे एसी चेअर कार आणि एक्झिक्युटिव्ह क्लास आणि विस्टाडोम कोचचे भाडे 25 टक्क्यांपर्यंत कमी केले जाणार आहे, अशी माहिती रेल्वे बोर्डाने एका आदेशात दिली आहे.
गेल्या 30 दिवसांत ज्या रेल्वेगाड्यांमध्ये 50 टक्क्यांपेक्षा कमी जागा आरक्षित आहे, अशा रेल्वेगाड्यांमध्ये सवलत देण्याची प्रक्रिया सुरू करण्यास रेल्वे बोर्डाने रेल्वेच्या विविध झोनला निर्देश देण्यात आले आहेत. या रेल्वेगाड्यांमधील जास्तीत जास्त जागांचे आरक्षण व्हावे, यासाठी भाड्यात ही कपात केली जाणार असल्याचे संबंधित रेल्वे अधिका-यांनी सांगितले.
याशिवाय भाडेदेखील वाहतुकीच्या स्पर्धात्मक पद्धतींवर अवलंबून राहणार आहे. यामुळे प्रवाशांना निश्चितच दिलासा मिळणार असून पुढील काळात “वंदे भारत’ला अधिक पसंती मिळेल.
दरम्यान, काही दिवसांपासून भाडे कमी करण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात होती. त्यासाठीच भारतीय रेल्वे तिकिटांच्या किमती कमी करण्यासाठी आणि प्रवाशांसाठी अधिक व्यवहार्य प्रवास बनवण्यासाठी कमी प्रवासी असलेल्या काही कमी अंतराच्या “वंदे भारत’ यासारख्या ट्रेनच्या भाड्यांचा आढावा घेतला.
मूळ भाड्यात मिळणार सवलत…
मूळ भाड्यावर जास्तीत जास्त 25 टक्के सूट मिळणार आहे, असेही रेल्वे बोर्डाने सांगितले. तसेच आरक्षण शुल्क, सुपर फास्ट अधिभार, जीएसटी इत्यादी इतर शुल्क सध्याच्या प्रमाणेच आकारले जाणार आहे. ही शिथिलता तातडीने लागू करण्यात येणार असल्याचे रेल्वे बोर्डाने सांगितले असले तरी आधीच बुक केलेल्या प्रवाशांना भाड्याचा परतावा दिला जाणार नाही.
प्रवासाच्या पहिल्या किंवा शेवटच्या टप्प्यासाठी, मध्यवर्ती स्टेशन्ससाठी किंवा सुरुवातीपासून शेवटपर्यंतच्या प्रवासासाठी सवलत दिली जाऊ शकते, जर त्या टप्पा/स्टेशन/सुरुवातीपासून शेवटच्या प्रवासादरम्यान जागा 50 टक्क्यांपेक्षा कमी आरक्षित असतील.