नवी दिल्ली – भारत दौऱ्यावर असणारे ब्रिटनचे परराष्ट्र मंत्री डॉमिनिक राब यांनी मंगळवारी परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर यांची भेट घेतली. त्यावेळी झालेल्या चर्चेत राब यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा मुद्दा उपस्थित केला. त्यामुळे दिल्लीच्या सीमांवरील आंदोलनाची दखल आंतरराष्ट्रीय समुदायाने घेतल्याचे पुन्हा समोर आले.
स्वत: राब यांनीच जयशंकर यांच्याशी झालेल्या चर्चेवेळी शेतकरी आंदोलनाचा मुद्दा उपस्थित केल्याची माहिती दिल्याचे वृत्त एका दैनिकाने दिले आहे. कृषी क्षेत्रातील सुधारणा हा भारताचा अंतर्गत विषय आहे. मात्र, ब्रिटनमध्ये भारतीय वंशाचे नागरिकही राहतात. त्यामुळे भारतातील आंदोलन हा ब्रिटनच्या राजकारणाचाही भाग आहे, असे राब निवडक पत्रकारांशी बोलताना म्हणाले.
शांततामय निदर्शने आणि जोमदार चर्चा या भारताच्या वारशाकडे आम्ही आदराने पाहतो. आम्ही स्थितीवर लक्ष ठेऊन आहोत, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. याआधी काही देशांच्या नेत्यांनी शेतकरी आंदोलनाबाबत वक्तव्ये केली. त्यावरून ते आंदोलन आणि संबंधित घडामोडी आमच्या अंतर्गत बाबी असल्याची तीव्र प्रतिक्रिया भारताकडून देण्यात आली होती.
त्यापार्श्वभूमीवर, राब यांनी शेतकरी आंदोलनाबाबत बोलताना समंजसपणे भूमिका मांडली.